नवी दिल्ली;- ५ ऑगस्टला अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी कोण हजेरी लावणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी ३०० जणांना आमंत्रित करण्यात येणार असल्याचे जन्मभूमि ट्रस्टकडून सांगण्यात आले होते. या सोहळ्यामध्ये देशातील प्रसिद्ध उद्योगपतींच्या नावांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

या सोहळ्याला रतन टाटा, मुकेश अंबानी, गौतम अदानी, कुमार मंगलम बिर्ला, आनंद महिंद्रा, राहुल बजाज, राजीव बजाज यांसारख्या १० उद्योगपतींच्या नावांचाही समावेश आहे. ५ ऑगस्टला मोदी सकाळी ११.३० वाजता अयोध्येत दाखल होणार आहेत. त्यानंतर ते राम जन्मभूमीच्या दिशेकडे रवाना होतील.
मिळालेल्या माहितीनुसार , भूमिपूजन कार्यक्रमात जवळपास २०० पाहुणे सहभागी होतील. यामध्ये ५० साधू-संत, ५० अधिकारी आणि ५० जण विश्व हिंदू परिषद (VHP) आणि न्यासाशी संबंधित असणार आहेत. तसेच, देशातील ५० नेत्यांचाही समावेश असणार आहे.







