नवी दिल्ली: देशभरात जीवनावश्यक वस्तूंचा अखंड पुरवठा करण्यासाठी भारतीय रेल्वे २४/७ काम करत आहे. अन्नधान्य, मीठ, साखर, दूध, खाद्यतेल, कांदे, फळे आणि भाज्या, पेट्रोलियम उत्पादने, कोळसा इत्यादी वस्तू रेल्वे टर्मिनल्सवर लोड केल्या जात आहेत.
कोरोना विषाणूच्या साथीच्या आजारामुळे भारतीय रेल्वेने ३१ मार्च २०२० पर्यंत देशभरातील प्रवासी रेल्वे सेवांचे कामकाज स्थगित केले आहे.सध्या भारतीय रेल्वे देशभरात फक्त मालवाहतूक करणा-या गाड्या चालवित आहे. भारतीय रेल्वे आपल्या अखंडित मालवाहतूक सेवांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे.
विविध राज्यांतील लॉकडाऊनच्या परिस्थिती दरम्यान, देशातील अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी अनेक माल धक्के ( गुड्स शेड), स्थानके आणि नियंत्रण कार्यालयांवर तैनात असलेले भारतीय रेल्वे कर्मचारी २४/७ सतत कार्यरत आहेत.
२३ मार्च २०२० रोजी अन्नधान्य, मीठ, खाद्यतेल, साखर, दूध, फळे आणि भाज्या, कांदा, कोळसा आणि पेट्रोलियम उत्पादने अशा आवश्यक वस्तूंसाठी एकूण ४७४ रॅक लोड करण्यात आले. दिवसभरात भारतीय रेल्वेने ८९१ रॅक लोड केले ज्यामध्ये लोहाच्या १२१ रॅक, स्टीलचे ४८ रॅक, सिमेंटचे २६ रॅक, खताचे २८ रॅक, कंटेनरचे १०६ रॅक इत्यादी महत्त्वाच्या वस्तूंचा समावेश आहे.