मुंबई – राज्याच्या माजी मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे निधन झाले आहे. नीला सत्यनारायण यांना कोरोनाची लागण झाली होती. मुंबईच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माहितीनुसार, पहाटे चार वाजता त्यांचे निधन झाल्याचे समोर येत आहे.

नीला सत्यनारायण यांचा जन्म मुंबईत ५ फेब्रुवारी १९४९ झाला. या १९७२च्या बॅचच्या (आता निवृत्त) सनदी अधिकारी असून त्या महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त होत्या. याशिवाय त्या मराठी साहित्यिक आहेत. त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या असून त्यांनी काही मराठी चित्रपटांसाठी आणि दोन हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केले आहे. नीला सत्यनारायण यांच्या कथेवरून ‘बाबांची शाळा’ हा मराठी चित्रपट निघाला. त्याचे संगीत दिग्दर्शन त्यांनीच केले होते.
नीला सत्यनारायण यांनी सनदी अधिकारपदाच्या ३७ वर्षांच्या कारकिर्दीत मुलकी खाते, गृहखाते, वनविभाग, माहिती आणि प्रसिद्धी, वैद्यक आणि समाजकल्याण, ग्रामीण विकास यासारख्या अनेक खात्यांत सनदी अधिकारी म्हणून काम केले. धारावीत काम करताना तिथल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना त्यांनी निर्यातक्षम चामड्याच्या वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून येणाऱ्या स्त्रियांना सक्षम करण्यासाठी क्रांतिज्योती महिला प्रशिक्षण अभियान सुरू केले.
नीला सत्यनारायण यांचे शालेय शिक्षण मुंबई, पुणे, नाशिक येथे झाले. त्यांनी शालान्त परीक्षा दिल्ली बोर्डातूनतून दिली. या परीक्षेत त्या १९६५ साली संस्कृतमध्ये प्रावीण्य मिळवून बोर्डात पहिल्या आल्या. नंतर त्यांनी त्यांनी इंग्रजी वाङ्मय या विषयात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यास पूर्ण केला. १९७२ साली त्या आय.ए.एस.ची परीक्षा पास झाल्या.







