जामनेर तालुक्यातील पहूर येथे घडली होती घटना
पहूर (वार्ताहर) :- पहूर कसबे परीसरातील राहिवासी अनिल रिखबचंद कोटेचा यांच्या घरातील चोरीस गेलेला १६ लाख ९० हजार ५७८ रुपये किमतीचा ऐवज मंगळवारी दि. ७ रोजी पहूर पोलीस स्टेशनला फिर्यादीला न्यायालयाच्या आदेशाने परत देण्यात आला.
अनिल कोटेचा हे दि. २५ ते २९ ऑगस्ट २०२१ या दरम्यान राजस्थान येथील जोधपूर येथे देवदर्शनाला गेले होते. यादरम्यान अज्ञात चोरट्यानी घराचा कडीकोंडा तोडून सोन्याची चैन, अंगठ्या, बांगड्या असा १६ लाख ९० हजार ५७८ रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. याबाबत पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी सैय्यद हारून (वय २५), अनिल रमेश चौधरी (वय ४०), सैय्यद आराफत फारुख (वय ३२), सैय्यद अमीन उर्फ बुलेट सैय्यद फारुख (वय २१), भावना जवाहरलाल लोढा (सर्व रा. जळगांव) यांना अटक करून चोरी गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
गुन्ह्यात फिर्यादी अनिल रिखबचंद कोटेचा यांनी जळगाव येथील न्यायालयात अर्ज देऊन गुन्ह्यातील गेला मुद्देमाल ताब्यात मिळणे कामीचा आदेश प्राप्त केला. त्यानुसार योग्य ती कागदोपत्री पूर्तता करून मुद्देमाल फिर्यादीचे ताब्यात देण्यात आला आहे. यावेळी पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, बिट अंमलदार विलास चव्हाण, भरत लिंगायत, पो. कॉ. गोपाळ माळी उपस्थित होते.