जळगाव ( प्रतिनिधी ) – आजची व्यक्ती दर्शन नव्हे तर प्रदर्शनावर जास्त भर देतो. आम्ही इतरांपेक्षा सरस कसे हे दाखविण्यातच वेळ व्यर्थ घालवित आहोत. द्रव्य, धन-दौलत याला भौतिक जगामध्ये अर्थ म्हटले जाते तेच तर सर्व अनर्थांचे मूळ आहे. जीवन जगण्यासाठी अर्था शिवाय अर्थ नसतो हे जरी खरे असले तरी चांगल्या मार्गाने धन कमवावे. या धन दौलतमुळे संबंध बिघडतात, स्वास्थ्य बिघडते. आजच्या मानवाच्या जीवनामधील सुख, शांती, आनंद आणि सहिष्णुता गमावून बसला आहे. अर्थाच्याबाबत प्रत्येकाने सावध असावे याविषयीचे मोलाचे मार्गदर्शन शासन दीपक परमपुज्य सुमित मुनिजी महाराज साहेब यांनी आजच्या प्रवचनातून केले.
आजच्या युगात सर्वच आत्म्यापेक्षाही अर्थ अधिक महत्त्वाचे मानतो. भाग्य आणि सौभाग्य याची संकल्पना स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, तुम्ही व्यापार करत आहात हे तुमचे भाग्य होय पण ते करत असताना तुमचा व्यवहार म्हणजे तुमचे सौभाग्य म्हणता येईल. सौभाग्यातून ‘सौ’ काढून टाकला तर भाग्य शिल्लक राहते. मानवाचा हल्ली असलेला व्यवहार मोठा विचित्र आहे. तो सुख, शांती आणि आरोग्यासाठी अर्थ कमावतो तो त्यात इतका व्यस्त होतो की आरोग्य, शांती आणि शांती गमावून बसतो. मग पुन्हा आरोग्य प्राप्त करण्यासाठी कमावलेले धन खर्च करतो. दुसरी खर्चाची गोष्ट म्हणजे घरातील मंगलकार्य असते. त्यात मोठ्या प्रमाणावर खर्च होत असतो. असे समजा मुलीच्या लग्नाला ५ कोटी रुपये खर्च केले असतील तर तुम्ही तुमचा बडेजावपणा दाखविण्यासाठी तो खर्च केला. या खर्चाबाबत विचार केला असता, मुलीला त्यातील किती टक्के पैसे मिळाले? याचे गणित मांडून बघा. कमावलेले धन दिखाव्यासाठी नसते हे कायम लक्षात ठेवावे. परमपुज्य ऋजुप्रज्ञ महाराज साहेब यांनी उत्तराध्यायन सुत्रच्या अध्यायांचा गोषवारा समजावून सांगत असलेल्या श्रुंखलेमध्ये आज ३१ व्या अध्यायातील २१ गाथांचे थोडक्यात स्पष्टीकरण केले. त्यात सांगण्यात आलेल्या महत्त्वाच्या गोष्टींची उपस्थितांकडून उजळणीही करून घेतली. ‘शासन मिला प्रभु का, सौभाग्य है हमारा | आराधना हो ऐसी, नहीं जन्म ले दुबारा ||’ हे गीत ही म्हटले गेले.