रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांचा सवाल
रावेर (प्रतिनिधी) : मे महिन्यात वादळी वाऱ्यासह पावसामुळे रावेर तालुक्यात ४४ गावांमध्ये १९५० शेतकऱ्यांचे केळी पिकाचे ५१ कोटी ३ लाख २२ हजार २९६ रुपयांचा नुकसानीचा अंतिम अहवाल प्रशासनाने जाहीर केला होता. शासकिय अधिकारी व सर्व पक्षिय राजकिय नेते मंडळी एकजुटीने प्रयत्न करून त्वरित मदत मिळवुन देऊ असे सांगत होते. मात्र आतापर्यंत या शेतकऱ्यांना शासकिय मदत न मिळाल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
मे महिन्यात तालुक्यातील तापी नदीच्या किनार पट्टीत वादळासह बे मोसमी पाऊस झाला होता .
यात कापणीवर आलेल्या केळी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन ४४ गावातील शेतकऱ्यांना याचा फटका बसला होता.
यावेळी सर्वच राजकिय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व नेते मंडळींनी बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश देऊन मदतीचे आश्वासन दिले होते.
परतु ३ महिने उलटले तरी शासकीय मदत मिळाली नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ज्या शेतकऱ्यांनी विमा संरक्षण केले होते त्यांनाच विम्याची रक्कम त्वरित मिळाली होती. परंतू ज्यांनी विमाच काढला नाही असे भरपुर शेतकरी मदतीपासून वंचीत राहीले आहेत . म्हणून त्यांना व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने केलेल्या पंचनामे नुसार भरपाई त्वरीत द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
ऐन कापणीला आलेल्या केळी बागांचे नुकसान झाले होते . खिरोदे प्रगणे, आठवडे , पुरी, तांदलवाडी इत्यादी गावांना या वादळाचा सर्वात जास्त फटका बसला होता. तरी या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरीत मदत मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे.