जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये कमी गुण मिळाल्यामुळे एका २५ वर्षे तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवार दि. १७ मे रोजी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आकाश भिमराव काटोले (बारी, वय २५, रा. शिरसोली-बारी नगर, ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो गावामध्ये आई-वडील, भावासह राहत होता. गेल्या काही वर्षांपासून तो महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह स्पर्धात्मक परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न बघत होता. गुरुवारी दि. १६ मे रोजी त्याचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दिलेल्या परीक्षेचा निकाल लागला. निकालामध्ये तो थोडक्यात काही गुणांनी नापास झाला.
यामुळे तो नैराश्यात गेला. शुक्रवारी दि. १७ मे रोजी नैराश्य सहन झाल्यामुळे त्याने राहत्या घरात संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. मोठा भाऊ घरात आला, तेव्हा त्याला हे दृश्य दिसले. त्यांनी आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्याला आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ यांनी तपासून त्यास मयत घोषित केले.
यानंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तरुणाच्या मृत्यूमुळे शिरसोली गावामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.