जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचा यशस्वी पाठपुरावा
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील रायपूर कुसुंबा येथून खेळता खेळता हरवलेले दोन बालक अखेर एका कर्तव्यपरायण व्यक्तीच्या मदतीने त्यांच्या पालकांच्या कुशीत विसावले. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पालकांनी पोलीस आणि नागरिकांचे आभार मानले आहे.
रायपूर कुसुंबा येथून दि. १८ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास कार्तिक जयसिंग परदेशी (वय ६ वर्षे), तसेच त्याच्यासोबत प्रियासु अजयकुमार वर्मा (वय ४ वर्षे) असे दोघे बालक खेळता खेळता कुठेतरी निघून गेले होते. सदर बाबतीत त्यांच्या पालकांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला माहिती दिली होती.
सदरचे दोन्ही मुले हे अल्पवयिन असल्यांने तसेच कार्तिक हा मुकबधिर असल्यांने सदर बालकांचा तातडीने शोध घेण्याचे काम सुरु केले होते. या दरम्यांन गुरुवारी दुपारी २ वा. सुमारास रिजवान शेख गनी रा. लक्ष्मीनगर, कानळदा रोड, जळगाव यांनी सदर बालक हे साईनगर एमआयडीसी परिसरात असलेबाबत माहिती दिली होती.
सदर ठिकाणी जाउन साईनगर एमआयडीसी परिसरातील मागील बाजुस असलेल्या मन्यारखेडा रोडवरुन सफौ अतुल वंजारी, पोह ईम्तीयाज खान, पो.ना. ईम्रान सैय्यद, पोना सचिन पाटील, मपोना निलोफर सैय्यद, साईनाथ मुंढे अशांनी सदर बालकांचा शोध घेतला व ते मिळुन आले होते. त्यांना पोलीस स्टेशनला आणून परिविक्षाधीन पोलीस उप अधिक्षक आप्पासो पवार, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्यासमक्ष त्यांच्या पालकाच्या ताब्यात देण्यात आले होते.
सदर बालकाचे पालक यांनी लागलीच शोध घेतल्या बददल् पोलीसांचे व माहिती देणारे रिजवान शेख गनी यांचे आभार मानले आहे.