जळगाव ( प्रतिनिधी ) – भाजपमधून फुटून शिवसेनेची साथ देऊन महापालिकेत सत्तांतर घडविणार्या सदस्यांना ४ आठवड्यांचा दिलासा सुप्रीम कोर्टाच्या आजच्या आदेशामुळे मिळाला आहे .
जळगावात २०१८ साली झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे ५७ सदस्य निवडून आले होते. यातील, २७ सदस्यांनी वेगळा गट स्थापन करून शिवसेनेच्या मदतीने मार्च २०२२ मध्ये सत्तांतर घडवून आणले .नंतर भारतीय जनता पक्षाने या सदस्यांना अपात्र करावे या मागणीसाठी न्यायालयात धाव घेतली . उच्च न्यायालयाने विभागीय आयुक्तांनी निर्णय द्यावा असे निर्देश दिले होते. विभागीय आयुक्तांकडे सुनावणी शेवटच्या टप्प्यात पोहचली असतांनाच महापौर जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली . त्यावर उच्च न्यायालयाच्या ऑर्डरला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती.
ही स्थगिती आज समाप्त होत असतांनाच सुप्रीम कोर्टाने आज मुदत वाढवून दिली . आता विभागीय आयुक्तांकडे सुरू असलेली सुनावणी सुरु ठेवावी मात्र चार आठवड्यांपर्यंत विभागीय आयुक्तांनी अंतिम निर्णय जाहीर करू नये असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिल्याची माहिती उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी दिली यामुळे महापालिकेतील बंडखोर गटाला दिलासा मिळाला आहे.