मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी झपाट्याने वाढ झाली आहे. आज कोरोनाचे तब्बल 1008 नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. एवढी मोठी रुग्णांची संख्या एका दिवसात आढळून येणं ही राज्यातील दुसरी वेळ आहे. त्यामुळं राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता 11 हजार 506 वर गेला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे. तसेच आज दिवसभरात 26 रुग्णांचा या आजारानं बळी घेतला आहे. त्यामुळं राज्यात मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या 485 वर पोहचली आहे. दरम्यान आज दिवसभरात 106 रुग्ण या आजारातून बरे झाले असल्यानं त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 1 लाख 53 हजार 125 नमुन्यांपैकी 1 लाख 40 हजार 587 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 11 हजार 506 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 63 हजार 26 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 11 हजार 677 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज झालेल्या 26 मृत्यूपैकी पुणे शहरातील 10, मुंबईचे 5, जळगाव जिल्ह्यातील 3 तर पुणे जिल्ह्यातील 1, सिंधुदुर्गमधील 1, भिवंडी महानगरपालिकेतील 1, ठाणे मनपामधील 1, नांदेड मधील 1,औरंगाबाद मनपामधील 1 तर 1 मृत्यू परभणी येथील आहे. या शिवाय उत्तर प्रदेशमधील एका नागरिकाचा मृत्यू मुंबई येथे झाला असल्याची माहिती आहे. मृत झालेल्या रुग्णांमध्ये 18 पुरुष तर 8 महिलांचा समावेश असून त्यापैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 14 रुग्ण आहेत तसेच 11 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर एक जण 40 वर्षांखालील आहे