
मुंबई ( प्रतिनिधी ) – तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करण्याची संधी मुंबई सत्र न्यायालयाने नाकारली आहे.


सत्र न्यायालयाने या दोन्ही नेत्यांचे अर्ज फेटाळून लावले . त्यामुळे हे दोन्ही नेते 10 जून रोजी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करू शकणार नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. या दोन्ही नेत्यांना मतदान करता यावं म्हणून राष्ट्रवादीने कोर्टात धाव घेतली होती. ईडीने त्याला आक्षेप घेतला होता. आता कोर्टानेच या दोन्ही नेत्यांना मतदानाची परवानगी नाकारल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबई उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली आहे. उच्च न्यायालयनेही सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवल्यास आघाडीची मते दोनने घटणार आहे
मुंबई सत्र न्यायालयाने परवानगी नाकारल्यानंतर आता राष्ट्रवादीला उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे आजच राष्ट्रवादीकडून उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला जाण्याची शक्यता आहे.
जुलै 2017मध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडली होती. रामनाथ कोविंद हे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मैदानात होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि रमेश कदम हे तुरुंगात होते. या दोन्ही नेत्यांना मतदान करण्याची कोर्टाने परवानगी दिली होती. त्याच धर्तीवर राष्ट्रवादीने कोर्टात युक्तिवाद करत मलिक आणि देशमुखांना मतदान करू देण्याची विनंती कोर्टाला केली होती.








