जळगाव ( प्रतिनिधी ) – १५ वर्षापासून सोने चांदीचे दागिने तयार करणाऱ्या कारागिराने विश्वास संपादन करीत मारोती पेठेतील दोन व्यापाऱ्यांची ५ लाख ७४ हजार रुपयांत फसवणूक केली आहे. निपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
मारोती पेठ येथील रहिवासी सुशांत तारकनाथ भुतका ( वय ४२ ) यांचा ते राहत असलेल्या परिसरात दागिने बनविण्याचा कारखाना आहे. या कारखान्यात बापन मंटू कारक ( वय २८ रा. पश्चिम बंगाल ) हा १५ वर्षांपासून दागिणे बनविण्याचे काम करत होता. त्याने विश्वास संपादन करुन घरबांधकामासाठी पैशांची आवश्यकता असल्याचे सांगत कारखान्याचे मालक सुशांत भुतका यांच्याकडून २ लाख ६० हजार रुपये घेतले. दरम्यान त्याने दिपक संघवी यांच्याकडूनही ३ लाख १४ हजार रुपयांचे दागिणे बनिवण्यासाठी घेतले होते. एके दिवशी बापन कारक हा दिसून आला नाही. सर्वत्र शोध घेतला मात्र मिळून आला नाही त्याच्याशी संपर्कही केला मात्र संपर्कही झाला नाही. सुशांत भुतका यांच्याकडून घेतलेले २ लाख ६० हजार रुपये व दिपक संघवी यांचे ३ लाख १४ हजार रुपयांचे दागिणे परत न करता दोघां व्यापाऱ्यांची एकूण ५ लाख ७४ हजार रुपयांत बापन कारक याने फसवणूक केली. पैसे तसेच दागिणे परत मिळत नसल्याने दोन महिन्यानंतर सुशांत भुतका यांनी बापन कारक याच्याविरोधात शनिपेठ पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक प्रदीप बोरुडे हे करीत आहेत.