नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – कोरोनामुळे देशात गेल्यावर्षी जनगणनेची प्रक्रिया राबवण्यात आली नाही. भारतात दर दहा वर्षांनी जनगणना प्रक्रिया राबवली जाते. यापूर्वी ही प्रक्रिया कागदोपत्री केली जायची. आता जनगणना प्रक्रियेचं डिजिटलायझेशन करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे. ही प्रक्रिया डिजिटल केल्यामुळे मोजणी आणखी सोपी होणार आहे. जन्म आणि मृत्यू रजिस्टरही याला जोडण्यात (लिंक) येणार आहे.
यामुळे देशात प्रत्येक जन्म आणि मृत्यूनंतर जनगणना आपोआप अपडेट होणार आहे. गृह मंत्रालयाने जनगणना सुलभ करण्यासाठी आधुनिक तंत्रांचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. ते आसाममधील डिरेक्टोरेट सेन्सस ऑपरेशन्स इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
“पुढील जनगणना ई-जनगणना असेल. जी १०० टक्के परिपूर्ण जनगणना असेल. या जनगणनेच्या आधारावर, पुढील २५ वर्षांसाठी देशाच्या विकास कामांचं नियोजन केलं जाईल,” असंही ते म्हणाले. जनगणना प्रक्रियेला जन्म-मृत्यू रजिस्टरही लिंक केलं जाणार आहे. त्यामुळे बाळाच्या जन्मानंतर त्याचा तपशील जनगणना नोंदणीमध्ये आपोआप जोडला जाईल. संबंधित पाल्य १८ वर्षांचा झाल्यानंतर, त्याचं नाव मतदार यादीत समाविष्ट केलं जाईल आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याचं नाव यादीतून हटवलं जाईल. संबंधित व्यक्तीचं नाव आणि पत्ता बदलणं देखील अधिक सोपं होईल. याचा अर्थ आपली जनगणना आपोआप अपडेट होईल,” असंही अमित शाह म्हणाले.