रावेर ( प्रतिनिधी ) – आवडीचे जेवण बनवले नसल्याचा राग अनावर झालेल्या मुलाने संतापात खाटेच्या माचल्याच्या दांडक्याने केलेल्या मारहाणीत बापाचा मृत्यू झाल्याची घटना काल रावेर तालुक्यातील पाल येथे घडली .

पाल (ता.रावेर) येथे गट नंबर २७१ शेतात अनाज्या भारत्या बारेला (वय ७५) राहात होता. सोमवारी सायंकाळी त्यांनी मुलगा दिनेश (वय २६) यास जेवण करून घेण्यास सांगितले. यावेळी दिनेशने काय केले आहे असे विचारले असता त्याच्या वडीलांनी उडीद दाळ व भाकरी केल्याचे सांगितले.
उडीद दाळ व भाकरी केल्याचा राग येऊन दिनेशने वडील व बहीणीस चापटा बुक्यांनी मारहाण केली. त्याचे वडील तेथून पळून जात असतांना दिनेश याने लाकडी खाटेच्या माचल्याच्या दांडक्याने वडील अनाज्या बारेला यांच्या तोंडावर व डोक्यावर तडाखा मारून गंभीर दुखापत करून जीवे ठार मारले. बनाबाई नरसिंग बारेला यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून रावेर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि सचिन नवले करीत आहेत. विभागीय पोलीस अधिकारी लवांडे, सपोनि शितलकुमार नाईक, पो नि मनोहर जाधव व पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा केला. संशयीत दिनेश यास पोलीसांनी अटक केली आहे.







