जळगाव ( प्रतिनिधी ) – यावल तालुक्यातील चितोडा येथे चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्यामुळे ३ मुलांना विषबाधा झाल्याचे आज दुपारी उघडकीस आले . यापैकी दोन जणांवर यावलच्या रुग्णालयात उपचार सुरु असून एकला भुसावळ येथे हलविण्यात आले आहे. गावात खळबळ उडाली आहे.
चितोडा येथे आज जि.प.शाळेच्या अंगणात खेळत असताना वरूण योगेश इंगळे, कृष्ण किरण पाटील, दुर्गेश चंदू पाटील या तिघांनी चंद्रज्योती फळाच्या बिया फोडून खाल्ल्या. काही वेळातच त्यांना अस्वस्थ वाटून मळमळ आणि उलटीचा त्रास सुरु झाला. नागरिकांनी त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले .वरूण इंगळेला पुढील उपचारासाठी भुसावळ येथे हलविण्यात आले आहे.
या मुलांना उलट्या होत असल्याचे लक्षात घेत त्यांना सरपंच सलीम तडवी, पोलीस पाटील पंकज वारके, ग्रा.प.सदस्य मनोज पाटील आदींनी यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
रस्ताच्या कडेला किंवा शाळेच्या परिसरात झुडुपांसारख्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या या वनस्पतीची फळं आकर्षक असल्याने लक्ष वेधून घेतात. परंतु चंद्रज्योतीचे फळ किंवा बिया खाल्ल्याने लहान मुलांना विषबाधा होत असल्याचे दिसून आले आहे. काजुच्या बिया समजून लहान मुलं या बिया फोडून खात असल्याचं बऱ्याचदा पाहायला मिळालं आहे. फळ खाल्यानंतर लहान मुलांना वारंवार उलट्या, ओटी-पोटात वेदना होतात, तोंडातून फेस येतो. जीवाला देखील धोका निर्माण होऊ शकतो.