मुंबई (वृत्तसंस्था) – सचिन वाझे प्रकरण, परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर धक्कादायक आरोप करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेले पत्र या एकूण राज्यातील प्रकरणांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यानंतर मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन फोन टॅपिंग प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत महाविकास आघाडीतील नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना टोला लगावला आहे.

भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर भातखळकर यांनी एक ट्विट करून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ”गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दुकानदारीचे वस्त्रहरण करणारे नवे पुरावे आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उघड केले. पण तरीही ते निर्लज्जपणे खुर्ची उबवत बसले आहेत, तेवढाच निर्लज्जपणा दाखवत त्यांचे नेते देशमुखांचे समर्थन करित आहेत. थोडक्यात काय तर १०० कोटीत प्रत्येकाचा वाटा आहे, अशी भातखळकर यांनी केली आहे.
भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणजेच शरद पवार यांच्यावरही थेट नाव न घेता ‘त्यांचे नेते’ असा उल्लेख करत या ट्विटच्या माध्यमातून टीका केली आहे. पोलीस खात्यांमधील बदल्यासंदर्भातील घोटाळ्याचे पुरावे असतानाही कोणतीही कारवाई मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी केली नाही, असा आरोप करत देवेंद्र फडणवीस यांनी आता हे सर्व पुरावे केंद्रीय गृह सचिवांकडे देऊन CBI चौकशीची मागणी करणार असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्तराँ आणि अन्य आस्थापनांमधून १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा धक्कादायक आरोप त्यांनी या पत्रातून केला आहे. भाजपाने या मुद्यावर आक्रमक भूमिका घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. तर नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजपसह रिपाइं, वंचित बहुजन आघाडी आणि अन्य पक्षांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी आग्रही मागणी केली आहे.







