अमरावती (वृत्तसंस्था) – विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वाढीव वीजबिल मुद्यावरुन राज्य सरकारवर घणाघाती टीका केलीय. लॉकडाऊनमध्ये आलेली वीजबिल यात सवलत देऊ असं ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सांगितले होते. मात्र, त्यांनी लोकांचा विश्वासघात केला, अशी टीका त्यांनी केली. देवेंद्र फडणवीस अमरावती शिक्षक मतदरासंघातील भाजप उमेदवार नितीन धांडे यांच्या प्रचारासाठी आले होते, त्यावेळी माध्यमांशी बोलत होते.

राज्य सरकारची भूमिका लोकविरोधी असल्याची घणाघाती टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीत केली. तर हे सरकार घोषणा करते व त्यावर पलटते,लॉकडाऊनमध्ये वीज बिलात सवलत देऊ या घोषणा वारंवार सरकारने केल्या. तीन कॅबिनेट मंत्र्यांनी याची घोषणा केली होती. आता म्हणाले अभ्यास झाला नाही त्यामुळे हे सरकार लोकविरोधी आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांना सोबत घेणार का?, असं विचारले असता, भाजप स्वबळावर लढणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.लॉकडाऊनच्या काळात राज्यातील नागरिकांना भरमसाठ वीजबिले आली. याबाबत सवलत देण्याचे महाविकास आघाडी सरकारने जाहीर केले होते. पण आता या सरकारच्या ऊर्जामत्र्यांनीच स्वतः वीजबिलाबाबत दिलासा देता येणार नाही आणि नागरिकांना ती भरावी लागतील, असे स्पष्ट सांगितले आहे. दुसरीकडे महावितरण सक्तीने वीजबिले वसूल करण्याच्या प्रयत्नात आहे. महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. या सरकारला सत्तेच्या धुंदीतून जागे करण्यासाठी भाजपा राज्यात सर्वत्र वीजबिलांच्या होळीचे आंदोलन करणार आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.
पाटील म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळात आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते, त्यामुळे नागरिकांना फार मोठा आर्थिक ताण सहन करावा लागला. अशा परिस्थितीत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने इतर राज्यांप्रमाणे हातावर पोट असणारे श्रमिक, रस्त्यावरील व्यावसायिक, बारा बलुतेदार, शेतकरी, रिक्षाचालक, टॅक्सीचालक इत्यादींना स्वतःहून पॅकेज द्यायला हवे होते. या सरकारने अजूनही जनतेला कोणत्याही प्रकारचे पॅकेज दिलेले नाही. उलट वीज कंपन्यांच्या भोंगळ कारभारामुळे भरमसाठ वीजबिले आली आहेत. त्याबाबत रास्त सवलत देण्यासही सरकार तयार नाही. त्यामुळे भाजपाने या प्रश्नावर जनहितासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ठिकठिकाणी भाजपचे कार्यकर्ते सोमवारी वीजबिलांची होळी करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहेत.







