सदृढ आरोग्यासाठी शुद्ध पाणी काळाची गरज ! पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव (प्रतिनिधी) – ८०% आजार हे अशुद्ध पाण्यामुळेच होत असतात त्यामुळे पिण्याचा पाण्याची योग्य तपासणी करूनच पाणी पिणे योग्य आहे . सदृढ आरोग्यासाठी शुद्ध पाणी काळाची गरज असून सोशल डिस्टसिंग, मास्क व हात स्वच्छ धुणे ही त्रिसूत्री उपयुक्त असून सर्वांनी याचे पालन करण्याचे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. अंजन विहीरे व वाकटूकी येथे आर.ओ.प्लांटच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ होते.
यावेळी ना.गुलाबराव पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या कार्याचे कौतुक केले. अंजन विहीरे व वाकटूकी परिसरातील शेतकऱ्यांसाठी अंजनी प्रकल्पातून पाठ चारीचे काम मंजूर करणार असून शेती रस्त्यांना भविष्यात प्राधान्य देणार आहे. धार ते खामखेडा, रेल फाटा ते रेल, या रस्त्यांच्या कामांना ग्रामस्थांनी केलेल्या मागणी नुसार मंजूरी देणार असल्याचे सांगितले तसेच गाव विकासासाठी व गावात शांतात प्रस्तापित करण्यासाठी शेतीच्या बांधावरून तक्रारी न करता एकमेकांना सामंजस्याने सहकार्य करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले . यावेळी जि.प. सदस्य गोपाल चौधरी, जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांची एकजूट महत्वाची असून “माझे कुटुंब – माझी जबाबदारी” या शासनाच्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
भरघोस निधी दिल्याबद्दल ग्रामस्थांनी केला पालकमंत्र्यांचा सत्कार !
अंजन विहीरे व वाकटूकी गावासाठी रवींद्र चव्हाण, ग्राम पंचायत व ग्रामस्थांच्या मागणी नुसार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गावासाच्या विविध विकास कामाकरिता अंजन विहीरे व खामखेडा रस्त्यालगत झिरी नदीवरील पुलाचे काम, स्मशान भूमी बांधकाम, शाळेचे वाल कंपाउंड , ग्राम पंचायत कार्यालय, शेत रस्ते, वाटर कुलर तसेच अंजन विहीरे फाटा ते धार या २.५ कि.मी. रस्त्याचे डांबरी करणाची कामे मंजूर केले यासाठी सुमारे ४ कोटी रुपयांच्या निधी दिल्याबद्दल ग्राम पंचायत, विविध कार्यकारी सोसायटी, शेतकरी व ग्रामस्थांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार केला. यावेळी ग्रामस्थांच्या प्रेमाने ना. गुलाबराव पाटील भारावून गेले.







