मारहाणीत ग्रामसेवकाचा मृत्यू, सात जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
पारोळा (प्रतिनिधी) – शासकीय कर्तव्य बजावत असताना ग्रामसेवकाशी वाद घालून मारहाण केल्याने त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पारोळा पोलिसांनी एका मुख्य संशयितास तत्परतेने अटक केली आहे. या प्रकरणी एकूण सात जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील शिवरे येथे १७ ऑगस्ट रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेदरम्यान कर्तव्य बजावत असलेले ग्रामसेवक प्रल्हाद पाटील (वय ५२) यांच्याशी जुन्या बिलांच्या कारणावरून काही ग्रामस्थांनी तीव्र वाद घातला. या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. सात जणांच्या टोळक्याने पाटील यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. या हल्ल्यानंतर आपला जीव वाचवण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच प्रल्हाद पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेचे गांभीर्य ओळखून पारोळा पोलीस ठाण्यात सातही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०५ (सदोष मनुष्यवध) अन्वये गुन्हा (गु.र.नं. ३१५/२०२६) दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपासाची जलद चक्रे फिरवत यातील एका मुख्य आरोपीला तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत, तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
दरम्यान, मृत ग्रामसेवक प्रल्हाद पाटील यांच्या पार्थिवावर आज, १८ ऑगस्ट रोजी त्यांच्या बोधर्दे (ता. पारोळा) या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी परिसरात चोख बंदोबस्त तैनात केला आहे. घटनेचा पुढील तपास पारोळा पोलीस करत आहेत.








