दिव्यांग, अनाथ आणि वंचित विद्यार्थ्यांशी साधला संवाद; आत्मविश्वास व स्वावलंबनाचा दिला प्रेरणादायी संदेश
जळगाव (प्रतिनिधी) – सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांनी जळगाव दौऱ्यादरम्यान दीपस्तंभ फाऊंडेशनच्या ‘मनोबल’ प्रकल्पाला सदिच्छा भेट देत विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. त्यांच्या या भेटीमुळे संस्थेतील विद्यार्थ्यांना प्रेरणेचा नवा स्रोत मिळाला.


यावेळी मा. गवई यांनी ‘मनोबल’ प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक, कौशल्य विकास आणि सामाजिक उपक्रमांची माहिती घेतली. कला व कौशल्य विभागातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आकर्षक हस्तकला वस्तूंचे त्यांनी विशेष कौतुक केले.

तसेच दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर आणि आर्थिकदृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिक्षण, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमालाही त्यांनी उत्स्फूर्त दाद दिली.
यावेळी मा. भूषण गवई यांनी ‘मनोबल’ प्रकल्पाशी निगडित जुन्या आठवणींनाही उजाळा देत संस्थेच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी विनय गोसावी आणि पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपस्तंभ फाऊंडेशनचे संचालक परेशभाई शाह आणि राजेंद्र पाटील यांच्या हस्ते मा. भूषण गवई यांचा मानपत्र व विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांना मिळाली नवी प्रेरणा
मा. भूषण गवई यांच्या सदिच्छा भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये नव्या आत्मविश्वासाची भावना निर्माण झाली असून, दीपस्तंभ फाऊंडेशनच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याला या भेटीमुळे निश्चितच नवी ऊर्जा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.









