जळगाव ( प्रतिनिधी ) : प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात मंजूर झालेल्या घरकुलांपैकी अद्याप अपूर्ण असलेल्या घरकुलांचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत त्या स्वतः लाभार्थ्यांच्या भेटी घेऊन घरकुलांच्या कामांचा आढावा घेत असून बांधकाम पूर्ण करण्याचे आवाहन करीत आहेत.


पंतप्रधान आवास योजना टप्पा-१ अंतर्गत जिल्ह्यात एकूण 76754 घरकुले मंजूर करण्यात आली असून त्यापैकी 5949 घरकुले अद्याप अपूर्ण अवस्थेत आहेत. या अपूर्ण घरकुलांची संख्या कमी करून सर्व पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर स्वतःचे घर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा स्तरावर सातत्याने आढावा घेतला जात आहे.
याच अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी यावल तालुक्यातील डांभूर्णी तसेच धरणगाव तालुक्यातील नांदेड येथे भेट देऊन लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी त्यांनी लाभार्थ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच घरकुलांचे प्रलंबित बांधकाम तातडीने पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या.
ज्या लाभार्थ्यांना घरकुलाच्या पहिल्या ते तिसऱ्या हप्त्याचे अनुदान वितरित करण्यात आले आहे, त्यांनी बांधकामास गती देऊन कामे तात्काळ पूर्ण करावीत, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी यावेळी केले. तसेच संबंधित यंत्रणांनी लाभार्थ्यांना आवश्यक ते मार्गदर्शन करून अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला पक्के घर उपलब्ध करून देण्याच्या शासनाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असून अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.ज्यांची घरकुले अपूर्ण असतील अशा लाभार्थ्यानी तत्काळ बांधकामे सुरू करून अपूर्ण घरकुले पूर्ण करून घ्यावीत असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी केले आहे.








