जळगाव तालुक्यातील वडली येथील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – कर्जबाजारीपणामुळे आलेल्या मानसिक तणावातून जळगाव तालुक्यातील वडली येथील एका ६२ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही दुर्दैवी घटना १६ फेब्रुवारी २०२६ रोजी वडली शिवारातील शेतात घडली.

हिरामण झिपरू धोबी (दहीभाते), वय ६२, रा. वडली, ता. जळगाव असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. हिरामण धोबी हे गेल्या अनेक दिवसांपासून चिंतेत होते. त्यांनी शेतीसाठी कर्ज घेतले होते, परंतु कर्जाचा डोंगर वाढत गेल्याने ते प्रचंड मानसिक तणावाखाली होते. कर्जाच्या विवंचनेत असलेल्या हिरामण यांनी १६ फेब्रुवारी रोजी स्वतःच्या शेतात जाऊन गळफास घेतला.
रुग्णालयात मृत घोषित: हा प्रकार लक्षात येताच त्यांचे पुतणे विकास दहीभाते यांनी त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. शेतकरी आत्महत्येची ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.









