डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील शल्यचिकीत्सकांच्या टीमचे उल्लेखनीय यश
जळगाव ( प्रतिनिधी ) – काही दिवसांपासून तीव्र पोटदुखी, पोट फुगणे, सतत गॅस होणे तसेच संडास न होण्याच्या त्रासाने हैराण झालेल्या ३८ वर्षीय महिलेच्या पोटातील आतड्यांना पडलेला गंभीर पीळ डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ज्ञ शल्यचिकीत्सकांच्या टीमने वेळेत ओळखून शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरीत्या सोडविला. वेळेवर निदान आणि तातडीच्या उपचारामुळे महिलेचा जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

याबाबत माहिती अशी की, पाचोरा येथील सरला भिवसने (वय ३८) या महिलेला मागील काही दिवसांपासून सतत पोट फुगणे, तीव्र वेदना, गॅसचा त्रास तसेच पूर्णपणे संडास न होण्याची समस्या जाणवत होती. सुरुवातीला साधा पोटदुखीचा त्रास समजून दुर्लक्ष करण्यात आले. मात्र वेदना वाढत गेल्याने आणि पोट अधिक फुगू लागल्याने रुग्णाला तातडीने डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात दाखल करण्यात आले.रुग्णालयात दाखल केल्यानंतर विभागप्रमुख डॉ. शिवाजी सादुलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वैभव फरके, डॉ. शुभम कालरा यांनी महिला रूग्णाची सखोल तपासणी केली. प्राथमिक तपासणीनंतर संशय अधिक बळावल्याने रुग्णाची सोनोग्राफी व सीटी स्कॅन तपासणी करण्यात आली. या तपासण्यांमध्ये पोटातील लहान आतड्यांना गंभीर स्वरूपाचा पीळ पडल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे अॅक्युट इंटेस्टाइनल ऑब्स्ट्रक्शन असल्याचे निदान करण्यात आले.
धोका ओळखून तातडीची शस्त्रक्रिया
ही स्थिती अत्यंत धोकादायक असून वेळेवर उपचार न झाल्यास आतड्यांचा रक्तपुरवठा बंद होऊन आतडे काळे पडण्याची तसेच जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे डॉक्टरांनी विलंब न करता तातडीच्या शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. डॉ. वैभव फरके, डॉ. शुभम कालरा, डॉ. प्रज्योत कदम, डॉ. सुशांत जाधव या शल्यचिकीत्सकांच्या अनुभवी टीमने तातडीने शस्त्रक्रिया करत पोटातील आतड्यांचा पीळ सावधपणे सोडविला. शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर रुग्णाची प्रकृती हळूहळू सुधारू लागली आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे रुग्ण व तिच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे. वेळेत योग्य उपचार मिळाल्याने मोठा अनर्थ टळल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. शस्त्रक्रियेसाठी भूलशास्त्र तज्ज्ञ डॉ. शीतल फेगडे, डॉ. मारीया यांनी सहकार्य केले.
महात्मा फुले योजनेत मोफत उपचार
या शस्त्रक्रियेसाठी लाखो रूपयांचा खर्च लागतो. मात्र डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतंर्गत महिला रूग्णावर संपूर्ण उपचार मोफत करण्यात आले.
पोट फुगणे, सतत गॅस, उलटी, संडास न होणे किंवा तीव्र पोटदुखी ही आतड्यांच्या अडथळ्याची लक्षणे असू शकतात. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. या रुग्णाच्या बाबतीत वेळेवर तपासणी व शस्त्रक्रिया केल्यामुळे प्राण वाचविणे शक्य झाले. -डॉ. शुभम कालरा, निवासी, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.









