जळगाव तालुक्यात नशिराबाद येथील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – नशिराबाद येथील पेठ भागात राहणाऱ्या एका कुटुंबातील २२ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना २ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. शुभम सुनील माळी (वय २२) असे युवकाचे नाव आहे.


शुभमचे आई-वडील आणि भाऊ काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. आज सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास ते घरी परतले असता घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. वारंवार ठोठावूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी शुभम घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
तात्काळ त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला असून आजच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, याप्रकरणी पुढील तपास नशिराबाद पोलीस करीत आहेत.









