मुंबईत हॉटेल ताज पॅलेसमध्ये संपन्न झाला सोहळा
मुंबई ( प्रतिनिधी ) – मुंबई येथील चक्र व्हिजन इंडीया फाऊंडेशनच्या वतीने आयोजित दिमाखदार पुरस्कार सोहळ्यात कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान, शाश्वत विकास, देशाच्या विकासात आर्थिक योगदान तसेच मानवतावादी कार्य या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून, ज्यांनी देशाची सीमा ओलांडून जागतिक कल्याण व प्रगती घडवली आहे अशा व्यक्तींना गौरविण्यात येते. दरवर्षी जगातील १० पेक्षा अधिक देशांत आपले कार्य प्रस्थापित केलेल्या भारतीय उद्योगांना विवेकानंद इंटरनॅशनल रिलेशन्स पीस अवार्ड देऊन सन्मानित करण्यात येते.
२०२५-२६ या वर्षाकरिता शेती, शेतकरी आणि समाज उपयोगी कार्यासाठी जैन इरिगेशनच्या कार्याबद्दल जैन इरिगेशन सिस्टिम्स ली चे अध्यक्ष अशोक जैन यांना विवेकानंद इंटरनॅशनल रिलेशन्स पीस अवार्ड आज मुंबई येथील हॉटेल ताजमहाल पॅलेस च्या सभागृहात भव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
अशोक जैन यांच्यासह अम्रीता विश्वविद्यापाठाच्या कुलगुरू माता अम्रीतानंदमयीजी, भारत फोर्जचे चेयरमन बाबा कल्याणी, युपीएल ग्रुपचे चेयरमन विक्रम श्राॅफ, गोदरेज इंडस्ट्रीजचे चेयरमन नादिर गोदरेज, पीडीलाईट इंडस्ट्रीजचे चेयरमन मधुकर पारख, व्हाॅकार्ड लि.चे चेयरमन डाॅ. हुजेफा खोराखीवाला, क्युके टेक्नाॅलाॅजीचे चेयरमन मनीष झावर, सीईजी ग्रुपचे कार्यकारी संचालक विश्वास जैन, सुहाना मसालाचे संचालक विशाल चोरडीया यांनाही त्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला . गतवर्षी टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते .
कार्यक्रमास पद्मविभूषण व पद्मभूषण डाॅ. मनमोहन शर्मा हे प्रमुख अतिथी होते. अशोक जैन यांना भारतीय सैन्यातील वरिष्ठ अधिकारी लेफ्टनन्ट जनरल अरुण अनंथानारायणन, प्रसिद्ध चित्रपट अभिनेते जॅकी श्रॉफ, पद्मश्री डॉ. जी. डी. यादव, रवी अय्यर , वीर अवॉर्ड चे संयोजक गगन मल्होत्रा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी जैन इरिगेशन चे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन ही उपस्थित होते.
कार्यक्रमात दोन विषयांवर परिसंवाद झाले यात विविध मान्यवरांनी आपली मते व्यक्त केलीत. हा प्रतिष्ठित सोहळा दरवर्षी ११ सप्टेंबरला आयोजित केला जातो. सन १८९३ मध्ये शिकागो येथे भरलेल्या “वर्ल्ड्स पार्लमेंट ऑफ रिलिजन्स” मध्ये स्वामी विवेकानंदांनी दिलेल्या ऐतिहासिक भाषणाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. त्या भाषणातून त्यांनी जगासमोर भारताची शांतता, एकता आणि सामंजस्याची तत्त्वज्ञान मांडली होती. त्यातूनच “वसुधैव कुटुंबकम् – जग हे एकच कुटुंब आहे” हा शाश्वत संदेश त्यांनी दिला.
चक्र व्हीजन इंडीया फाऊंडेशन मुंबईचे मुख्य मार्गदर्शक गौरांग दास, मोहनजी, आचार्य लोकेश मुनीजी, पद्मश्री जी. डी. यादव, पद्मश्री डाॅ. इंदीरा आहुजा, रवी अय्यर, मनोज तिवारी, विनय सहस्त्रबुद्धे हे आहेत. तर वीर अवार्डच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सारीका पन्हाळकर यांच्यासह आर. वेंकटरमण, मालव श्राॅफ, ए. राजेशखरन, चंद्रमोहन पुपाला आणि अशोक मोटवाली आदी मान्यवर मार्गदर्शक समितीमध्ये आहे.
जैन इरिगेशन मधील पथदर्शी कार्य कृषी क्षेत्रात क्रांतिकारक ठरले आहे. पाणी व्यवस्थापन, सिंचन आणि अन्न शाश्वतता आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी देत असलेल्या अभिनव उपाययोजनांमुळे जगभरातील शेतकरी आणि समुदाय सक्षम झाले आहेत. आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाच्या समस्यांना उत्तर देण्याचे कार्य जैन इरिगेशन करत आहे. जैन इरिगेशनने आपले नेतृत्व आणि तंत्रज्ञान यामुळे सामाजिक जबाबदारीची जाण ठेवून केलेल्या उद्योजकतेचा रूपांतरकारी प्रभाव जगासमोर आणला आहे. “वसुधैव कुटुंबकम्” या तत्त्वाचा प्रत्यय जैन इरिगेशनच्या कार्यातून येतो, ज्यामुळे जागतिक सौहार्द वृद्धिंगत होत आहे आणि भारताची करुणा व उत्कृष्टतेची परंपरा मुळापासून जगभर पोहोचत आहे. ‘सार्थक करूया जन्माचे, रूप पालटू वसुंधरेचे’ हे जीवनध्येय समोर ठेऊन कार्य करत आहोत याचा आनंद आहे.
अशोक भवरलाल जैन
अध्यक्ष ,जैन इरिगेशन सिस्टिम्स ली
फोटो ओळ – अशोक जैन यांना प्रतिष्ठीत ‘विवेकानंद इंटरनॅशनल रिलेशन्स पीस अवार्ड’ प्रदान करताना भारतीय सैन्यातील वरिष्ठ अधिकारी लेफ्टनन्ट जनरल अरुण अनंथानारायणन, प्रसिद्ध चित्रपट अभिनेते जॅकी श्रॉफ , पदमश्री डॉ. जी. डी. यादव, रवी अय्यर , वीर अवॉर्डचे संयोजक गगन मल्होत्रा तर दुसऱ्या छायाचित्रात पुरस्कार सोहळ्यास उपस्थीत मान्यवर.