जामनेर तालुक्यातील टाकळी बुद्रुक येथे दुर्दैवी घटना
जळगांव (प्रतिनिधी) :- जामनेर तालुक्यातील टाकळी (बुद्रुक) गावात शुक्रवारी दि. २२ ऑगस्ट रोजी संध्याकाळच्या सुमारास पोहण्यास गेलेल्या तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची भीषण घटना घडली. याप्रकरणी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
निलेश मुरलीधर माळी (वय ४३) असे मयत तरुणाचे नाव आहे. निलेश माळी हा गावात परिवारासह राहतो. शुक्रवारी दि. २२ रोजी काही मित्रांसह गावाबाहेरील एका विहिरीत पोहण्यासाठी निलेश गेला होता. दरम्यान त्याने विहिरीत उडी घेतली असता, डोक्याला जोराचा मार लागून तो बेशुद्ध झाला. त्यामुळे त्याला पाण्यातून वर येता आले नाही आणि त्याचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
घटनेनंतर ग्रामस्थांनी तातडीने प्रयत्न करून मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर त्याला तातडीने जामनेर येथील सिव्हिल रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले.तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश रुग्णालयात केला होता. घटनेमुळे टाकळी बुद्रुक गावात शोककळा पसरली आहे. पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.