महावितरणची प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती
जळगाव (प्रतिनिधी) : ग्राहक तक्रारी कमी करुन ग्राहकांना अचुक व वेळेत वीजबिल देण्यास उपयुक्त ठरणारे अत्याधुनिक स्वरुपाचे ‘टीओडी’ वीजमीटर राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणे जळगाव जिल्ह्यातही बसविण्यात येत आहे. नवे ‘टी ओ डी’ वीजमीटर नवतंत्रज्ञानावर आधारित असून तांत्रिकदृष्ट्या ते अधिक स्मार्ट स्वरुपाचे असलेतरी ते प्रि-पेड नाही. शिवाय या नव्या मीटरचा ग्राहकांना कुठलाही आर्थिक भुर्दंड बसणार नसल्याची माहिती जळगाव मंडलाचे अधीक्षक अभियंता यांनी कळविली आहे.
टीओडी वीजमीटरमुळे मीटर रिडींग सोपी होणार आहे. त्यामुळे वीजबिलाच्या संदर्भाने होणाऱ्या ग्राहक तक्रारीतही कपात होईल. शिवाय ग्राहकांना वेळेत आणि अचुक बिल देता येणार आहे. सद्यस्थितीत कृषी वर्गवारी वगळता इतर सर्व वर्गवारीतील ग्राहकांना हे टी ओ डी वीज मीटर बसविण्यात येत आहे. जळगाव परिमंडलात एन सी सी या एजन्सीला मीटर बसविण्याचे काम देण्यात आले असून सुरवातीच्या काळात सरकारी कार्यालये, सरकारी निवासस्थाने, मोबाईल टॉवर, नादुरुस्त मीटरच्या ठिकाणी मीटर बदलतांना हे टी ओ डी मीटर्स बसविण्यात आले आहे. नवीन वीज जोडणी देतानाही हे नवीन मीटर बसविण्यात येत असून सोलार नेट मीटरींगसाठीही त्याचा वापर करण्यात आला आहे.
मागील तीन ते चार महिन्यात जिल्ह्यात २७ हजार २४४ टिओडी मीटर्स बसविण्यात आले आहेत. जळगाव शहर विभागात सरकारी कार्यालये, निवासी गाळे व मोबाईल टॉवर्ससाठी १६५८, नादुरस्त मीटर्सच्या ठिकाणी ३७५१, सोलार नेट मीटरींगसाठी १६५३ तर नवीन ग्राहक जोडण्यापोटी १२१४ मीटरचा वापर करण्यात आला आहे. नव्याने बसविण्यात येणारे वीजमीटर अत्याधुनिक व स्मार्ट स्वरुपाचे असले तरी ते प्रि-पेड नाही किंवा ते बसविण्यासाठी व मीटरची किंमत म्हणून ग्राहकांकडून कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही. ग्राहकाने वापरलेल्या विजेची अचुक नोंद घेवून अचूक वीजबिल देण्यास हे मीटर सहाय्यभूत ठरणार असल्याने वीज ग्राहकांनी मीटर बसविण्याकामी महावितरण आणि संबंधित एजन्सीला सहकार्य करावे असे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात येत आहे.