रावेर तालुक्यातील कुंभारखेडा येथील सकाळची घटना
जळगाव/रावेर (विशेष प्रतिनिधी) : रावेर तालुक्यात आज दि. ७ मार्च रोजी धक्कादायक घटना घडली आहे. सकाळी शेतात काम करीत असलेल्या मजुराच्या २ महिन्याच्या बाळाला झोळीतून ओढून नेत भटक्या कुत्र्यांनी गंभीर चावे घेतल्याने सदर बाळाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सदर पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु आहे.
अनिल सालम भिलाला (वय ३१, रा. चौपाली पोस्ट हिलापाडावा ता. झिरण्या जि. खरगोन, सध्या रा. कुंभारखेडा ता. रावेर) हे शेतमजुरी करण्यासाठी गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून राजू गुप्ता यांच्या शेतात आलेले आहेत.(केसीएन)त्यांना १ मुलगा श्याम आणि २ मुली आशिया (वय ५) आणि दिव्या (वय २ महिने) असे आहेत. शुक्रवार दि. ७ मार्च रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास अनिल भिलाला हे आणि त्यांची पत्नी मीना असे शेतात काम करण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी शेतमालक आणि गावातील काही मजूर काम करीत होते. तेथे २ महिन्यांची मुलगी दिव्या हिला झोप लागत असल्याने तिला झाडाला झोका बांधून झोक्यामध्ये झोपवलेले होते.
त्यानंतर दिव्याची आई-वडील आणि इतर मजूर शेतात काम करत होते. अचानक त्यांना चार ते पाच कुत्रे पळत असताना दिसले. सुरुवातीला त्यांना, कुत्रे जेवणाच्या डब्याकडे जात आहे असे वाटले. त्यावेळेला अनिल भिलाला हे कुत्र्यांच्या मागे पळाले. तेव्हा त्यांना लक्षात आले की, झोक्यात झोपवलेल्या बाळाला कुत्रे ओढून नेत होते.(केसीएन)तेव्हा कुत्र्यांच्या तावडीतून अनिलने बाळ दिव्याला सोडविले. कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळे दिव्या हिला खूप जखमा झाल्या होत्या. त्यामुळे आजूबाजूच्या मजुरांच्या मदतीने रुग्णालयात नेण्यात आले. त्या ठिकाणी दिव्या हिची तब्येत आणखी बिघडल्याने तिला जळगावला शासकीय रुग्णालयात नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.
त्यानंतर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आले असता तेथे दिव्या भिलाला या २ महिन्याच्या बाळाला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. कुत्र्यांनी दिव्या भिलाला हिच्या डोक्याला, हाताला, पायाला, पोटाला जबर चावे घेतले होते.(केसीएन)त्यामुळे गंभीर जखमी होऊन दिव्या हीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती डॉक्टरांनी दिली आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु होते. कुत्र्यांच्या हल्ल्यात बाळ मृत्युमुखी पडल्याने रावेर तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न शहरांसह ग्रामीण भागातही गंभीर बनत चालला आहे.