पुणे (वृत्तसंस्था) – मुळशी तालुक्यातील उरवडे येथील एका रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत १८ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता. या प्रकरणी एसव्हीएस कंपनीचा मालक निकुंज शहा (रा. सहकारनगर) याच्यावर पौड पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शहा याला मंगळवारी( दि.८) अटक केली. बुधवारी न्यायालयात हजर केल्यानंतर शहा याला १३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एस. बी गणपा यांनी हा आदेश दिला आहे.
निकुंज शहा ( वय ३९ रा. सहकारनगर) असे मालकाचे नाव आहे. त्यांच्यासह याप्रकरणी बिपीन शहा( वय ६८ रा .सहकारनगर) , केयुर बिपीन शहा ( वय ४१, मूळ रा सहकारनगर, रा . दुबई) आणखी दोन जणांवर पौड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी फिर्याद दिली आहे.
सोमवारी (दि .८ जून) एसव्हीए अॅक्वा कंपनीला आग लागून त्यात १८ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आणि ५ कामगार गंभीर जखमी झाले. या घटनेप्रकरणी सुरक्षिततेच्या नियनाचे पालन न केल्यास तसेच अनाधिकृत सॅनिटायझरचा बेकायदा साठा केल्याने आग लागू शकते व त्यात कामगारांचा जीव जाऊ शकतो याची पूर्वकल्पना असताना कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना न केल्याचा ठपका फिर्यादीत ठेवण्यात आला आहे.
कंपनीच्या मालकाला न्यायालयात बुधवारी हजर करण्यात आले. त्यावेळी सरकारी वकील निलेश लडकत यांनी युक्तिवाद करताना हा गुन्हा भीर स्वरूपाचा असून, या प्रकरणातील अन्य दोन आरोपीला अटक करायचे असल्याने आणि पोलिसांना अधिक तपास करायचा असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली. आरोपीच्या बाजूने अँड. हर्षद निंबाळकर यांनी काम पाहिले. मात्र न्यायालयाने सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.