नाशिक ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स (उत्तर महाराष्ट्र) नाशिक शाखेतर्फे सुवर्ण वर्ष महोत्सवानिमित्त दोन दिवसांची विकास परिषद आयोजीत करण्यात आली होती. या परिषदेमध्ये खान्देशच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चा गौरव करण्यात आला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यस्थापकिय संचालक अतुल जैन यांनी पुरस्कार स्वीकारला. हा पुरस्कार समारंभ नाशिक येथील कालीदास कलामंदिर येथे पार पडला. व्यासपीठावर पालकमंत्री छगन भुजबळ, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष उमेश दाशरथी, सुधाकर देशमुख उपस्थित होते.
या कार्यक्रमास खासदार हेमंत गोडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार देवयानी फरांदे , राज्य कौशल्य विकास आयुक्त दीपेंद्र कुशवाह, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., नाशिकचे पोलीस अधिक्षक व मान्यवर उपस्थित होते .
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या दोन दिवसीय विकास परिषदेत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य व कौशल्य विकास मंत्री राजेश टोपे यांच्यासह राज्यभरातील 120 पदाधिकारी सहभागी झाले होते. विकासात महिलांचा सहभाग वाढविणारे धोरण, औद्योगिक विकासात नव्या तंत्रज्ञानाचा सहभाग, पर्यटन आणि क्लस्टर बेस डेव्हलपमेंटचे धोरण यावर मंथन करण्यात आले.
जैन इरिगेशन सिस्टीम लि. यांच्यासह महिंद्रा एण्ड महिंद्रा, एचएएल, सह्याद्री फार्म, बेदमुथा इंडस्ट्री, दादासाहेब रावल ग्रुप ऑफ इंडस्ट्री, शिरपूर एज्यकेशन सोसायटी, महाराष्ट्र सलवंत एक्सट्रेक्शन- धुळे, मालपाणी ग्रुप-संगमनेर यांचाही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.