मुंबई ( प्रतिनिधी ) – हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार ८ मे पासून विदर्भात उष्ण लहरी धडकणार आहेत. त्यामुळे तापमानात अजून वाढ होण्याची शक्यता आहे. यंदा निर्माण होणाऱ्या उष्ण लहरींमुळे मे महिन्यात तापमानाचा जुना उच्चांक मोडला जाण्याची शक्यता खगोल अभ्यासकांकडून व्यक्त केली जातआहे.
मार्च महीन्याच्या पहील्या आठवड्यापासूनच विदर्भातील तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली होती. एप्रील महिन्यात तापमानाने उच्चांक गाठला होता. या मौसमातील राज्यातील सर्वात जास्त तापमानची नोंद एप्रिल महिन्यात करण्यात आली होती. अजूनही पाऊस सुरू होण्यास साधारणपणे महिन्याभराचा कालावधी शिल्लक आहे. आता हवामान खात्याने दिलेला इशारा विदर्भाची चिंता अधिक वाढवणारा आहे. सतत वाढत्या उष्णतेमुळे दुपारच्या वेळेस विदर्भातील रस्त्यांवर रहदारी कमी झाली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील मे महिन्यातील तापमानाचा जूना उच्चांक हा ४९ आणि ४८.२ अंश सेल्सिअस इतका नोंदवला गेला होता. उष्ण लहरी कायम राहील्या तर यावर्षी हा उच्चांक मोडला जाऊ शकतो असं मत तज्ञांनी व्यक्त केलं आहे.
सतत वाढत्या तापमानामुळे विदर्भात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी पाण्याच्या साठ्यात घट झाल्याचं पहायला मिळालं आहे. उष्ण लहरींमुळेच तापमानात वाढ होत आहे. प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.