नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – उत्तर सैन्यदलाचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सध्या भारत-पाकिस्तान सीमेवर सुमारे २०० दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. कोणत्याही क्षणी ते भारतात प्रवेश करू शकतात, असंही ते म्हणाले . लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी नॉर्थ टेक चर्चासत्रात एका प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते .
वर्षभरापासून भारत-पाकिस्तान सीमेवर शांतता आहे. गेल्या वर्षभरात तीन वेळाच शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. सीमेवर शांतता असली तरी जम्मू-काश्मीर दहशतवादी कारवायांच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. अलीकडेच दक्षिण काश्मीरमधील पहलगामच्या जंगल परिसरात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक घडली आहे. या चकमकीत सुरक्षा दलाने हिज्बुल मुजाहिदीनच्या कमांडरसह तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे.
पुढे ते म्हणाले की, वर्षभरात २१ विदेशी दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. सीमेपलीकडे दहशतवाद्यांना पोसलं जात आहे. पाकिस्तानच्या हद्दीत सहा मोठे दहशतवादी तळ आणि २९ लहान छावण्या आहेत.
हरियाणा पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी कर्नालमध्ये चार संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. अटक केलेल्या संशयितांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला हे सर्वजण पंजाबहून दिल्लीला जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले .