आसाम (वृत्तसंस्था) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आसाममध्ये ७ हजार ७००कोटी रुपयांच्या ‘असोम माला’ प्रकल्पाचाचा शुभारंभ केला. याव्यतिरिक्त राज्यात दोन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यासाठी भूमिपूजनही करण्यात आलं. यावेळी पंतप्रधानांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. पंतप्रधानांनी ग्रेटा थनबर्गच्या टुलकिट खुलाशावरही उत्तर दिलं. “आज देशाला बदनाम करण्यासाठी कट रचणारे या स्तरावर पोहोचले आहेत की त्यांनी भारताचा चहाही सोडला नाही. भारताच्या चहाची प्रतीमा मलिन करायची असल्याचं हे कट रचणारे म्हणत आहेत. काही दस्तऐवज समोर आले आहेत. भारताची ओळख ज्या चहाशी आहे त्यावर हल्ला करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं यातून समोर आलं आहे,” असं पंतप्रधान मोदी म्हणाले. “तुम्हाला हे सर्व चालणार आहे का? हा हल्ला करणाऱ्यांचं कौतुक तुम्हाला मान्य आहे का? या सर्व राजकीय पक्षांना भारताचा चहाची बाग असलेलं ठिकाणच उत्तर देईल. भारताच्या चहावर करण्यात येणाऱ्या हल्ल्यांमध्ये इतकी ताकद नाही की ते या चहा कामगारांचा सामना करू शकतील,” असंही त्यांनी नमूद केलं.

आसामच्या भूमीवर या कट रचणाऱ्यांना जे काही कट रचायचे आहेत ते रचू दे. परंतु आम्ही ते यशस्वी होऊ देणार नाही. माझा चहा कामगार ही लढाई नक्कीच जिंकणार असल्याचंही ते म्हणाले. “हिंसाचार, भेदभाव, तणाव, पक्षपात, संघर्ष या सर्व गोष्टींना मागे सोजून आता संपूर्ण पूर्वोत्तर भाग विकासाच्या मुद्द्यावर पुढे जात आहे. यामध्ये आसामनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ऐतिहासिक बोडो करारानंतर नुकतंच बोडोलँड भागातील निवडणुकांनंतर या ठिकाणी विकासाचा नवा अध्याय लिहिला आहे,” असं मोदी यांनी नमूद केलं.
सूर्योदय सर्वप्रथम पूर्वोत्तर भागात होतो. परंतु आराम आणि पूर्वोत्तर भागाला विकासासाठी मोठी वाट पाहावी लागली. असं का झालं? ही तिच भूमी आहे ज्यावर लोकांनी परदेशी आक्रमणकर्त्यांशी युद्ध केलं होतं. १९४२ मध्ये याच भूमिवर आसामच्या स्वातंत्र्य सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं होतं. त्यांचं बलिदान, त्यांचं साहस आमचा संकल्प अधिक मजबूत करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.







