उत्तराखंड (वृत्तसंस्था) – जोशीमठात मोठा हिमकडा कोसळल्याने धौली गंगा नदीला महापूर आला आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रचंड प्रवाहाबरोबर अनेकजण वाहून गेल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे जोशीमठ तालुक्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आज सकाळी 10.55 वाजता ही दुर्घटना घडली. जोशीमठ तालुक्यातील रैणी गावात हिमकडा कोसळला. त्यामुळे या धौली गंगा नदीला महापूर आला आहे. त्यातच या धरणाचा कडाही तुटल्याने या ठिकाणी पाणीच पाणी झाले असून अनेक घरे आणि माणसे वाहून गेले आहेत. निसर्गाच्या या प्रकोपामुळे उत्तराखंडमध्ये एकच हाहाकार माजला असून या ठिकाणी अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मोठा हिमकडा कोसळून नदीला महापूर आल्याने पुराचे पाणी घराघरात शिरले आहे. त्यामुळे धरणाजवळची अनेक गावं या पुरात वाहून गेली आहेत. तसेच माणसे, गुरेढोरेही वाहून गेली असून शेतीचंही मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. या ठिकाणी प्रशासानाचे कर्मचारी आणि रेस्क्यु ऑपरेशन टीम पोहोचली असून युद्धपातळीवर रेस्क्यु ऑपरेशन सुरू आहे.
या महाभयंकर घटनेवर मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. टचमोली जिल्ह्यात ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि आपत्कालीन विभागांना आपत्ती निवारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. खबरादारीचे सर्व उपाय योजले जात आहेत, असं रावत यांनी सांगितलं.
तपोवन रैणी परिसरात हिमकडा तुटल्याने ऋषीगंगा पॉवर प्रोजेक्टला मोठी हानी पोहोचली आहे. नदीचा जलस्तर वाढला आहे. त्यामुळे अलकनंदा नदीच्या किनारी असलेल्यांनी लवकरात लवकर दुसरीकडे शिफ्ट व्हावं, असं आवाहन चमोली पोलिसांनी केलं आहे.







