नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – केजरीवाल सरकारच्या पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या ‘घर घर राशन’ योजनेला केंद्राकडून स्थगिती देण्यात आली आहे. यावरून आता पुन्हा एकदा दिल्ली सरकार विरोधात मोदी सरकार असा वाद निर्माण झाल्याचं दिसत आहे. योजनेला केंद्राकडून स्थगिती देण्यात आल्याबद्दल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकारपरिषद घेत संताप व्यक्त केला.
जर या देशात पिझ्झा, बर्गरची होम डिलिव्हरी होऊ शकते, स्मार्ट फोन व कपड्यांची होम डिलिव्हरी होऊ शकते. तर मग गरिबांच्या घरी रेशनची होम डिलिव्हरी का नाही होऊ शकत? संपूर्ण देश जाणू इच्छित आहे की तुम्ही ही योजना रद्द का केली, असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केला.
ऑनलाईन पत्रकारपरिषदेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. पंतप्रधान मोदीजी तुम्हाला नमस्कार, आज मी अतिशय दुःखी आहे आणि मी थेट तुमच्याशी बोलू इच्छित आहे. जर माझ्याकडून काही चूक झाली, तर मला माफ करावं. दिल्लीत पुढील आठवड्यापासून घर घर रेशन पोहचवण्याचं काम सुरू होणार होतं. म्हणजे एका गरिबाला रेशन घेण्यासाठी रेशनच्या दुकानावरील धक्के सहन करावे लागणार नव्हते. उलट सरकार अतिशय चांगल्या प्रकारे चांगल्या दर्जाचं रेशन बांधून करून त्या गरिबाच्या घरी पाठवणार होती. सर्व तयारी झाली होती, टेंडर झाले होते. सर्व तयारी झाली होती, केवळ पुढील आठवड्यात हे सुरू होणार होतं. हे एक क्रांतिकारी पाउल ठरणार होतं आणि अचानक तुम्ही दोन दिवस अगोदर याला स्थगिती दिली. तुम्ही असं का केलं, असा सवाल केजरीवाल यांनी भाजपला विचारला.