मुंबई (वृत्तसंस्था) – महाराष्ट्राच्या राजकारणात २३ नोव्हेंबर २०१९ रोजी एक मोठा भूकंप झाला होता. देवेंद्र फडणवीस यांनी थेट भल्या पहाटे राष्ट्रवादीच्या अजित पवारांसोबत अचानकपणे शपथविधी उरकला. नंतर शरद पवारांनी ते सरकार पाडल हा भाग वेगळा. पण देवेंद्र फडणवीस यांनी अचानकपणे अजितदादांसोबत हातमिळवणी कशी काय केली असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला होता. दरम्यान एका मुलाखतीत खुद्द फडणवीसांनी याबाबत खुलासा केला आहे.
फडणवीस म्हणाले की, ‘तो निर्णय चूकच होता. पण त्याचा पश्चात्ताप नाही. कारण ज्यावेळी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला जातो, तेव्हा राजकारणात तुम्हाला जिवंत राहावं लागतं. कारण राजकारणात तुम्ही मेलात, तर त्याला उत्तर देता येत नाही. खंजीर खुपसला गेल्याला उत्तर द्यायचं होतं. त्यावेळच्या भावना, राग होता. त्यातून आम्ही ते केले.’
उद्धव ठाकरेंना आम्ही कधीही मुख्यमंत्रीपदाबाबत वचन दिले नव्हते’ असा दावा त्यांनी यावेळी केला तसेच महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंनी पहिली मुलाखत देऊन आमचे सर्व पर्याय खुले आहेत असं सांगितलं. तेव्हा आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकली असे फडणवीसांनी म्हंटल.