अमरावती (प्रतिनिधी) – कांद्याचे दर घसरल्याने गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आक्रमक झाले आहेत. संपूर्ण राज्यात कांद्याचा प्रश्न पेटलेला आहे. अद्यापही कांद्याच्या दरात वाढ झालेली नाहीये. रविवारी संध्याकाळी नाशिक येथे केंद्रीय मंत्री भारती पवार यांना शेतकऱ्यांनी घेराव घातला तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर कांदे फेकून मारण्याच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
केंद्रीय मंत्री भारती पवार आणि शेतकऱ्यांमध्ये वाद झाला आहे. कांदा दरावरून शेतकऱ्यांनी भारती पवार यांना घेराव घातला होता. नाफेड खरेदी आणि निर्यात प्रश्नावरून शेतकरी आणि केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्यात हा वाद झाला आहे. नाशिकच्या निफाड परिसरातील ही घटना आहे.
दरम्यान केंद्रीय मंत्री भारती पवार निफाड आणि येवला परिसरात जाऊन कांदा परिस्थितीचा आढावा घेत असतानाच त्यांच्यात आणि शेतकऱ्यांमध्ये वाद झाल्याचं समजतंय. कांद्याच्या घसरलेल्या दरांवरून शिरसगाव येथे मंत्री भारती पवार आणि शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली.
अमरावती शहरातील सायन्स कोर्स मैदानात मिलेट्स कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कृषी विभाग व आत्मा या संस्थेच्या माध्यमातून हा कृषी महोत्सव भरविण्यात आला. याच कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रविवारी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फडणवीस यांच्या ताफ्यावर कांदे फेकण्याचा प्रयत्न केला. पालकमंत्र्यांच्या निषेधार्थ घोषणा करत असतानाच पोलीस प्रशासनाने संबंधित कार्यकर्त्यावर अटकेची कारवाई केली. राज्यातील कांदा प्रश्न पेटल्याने ठिकठिकाणी शेतकरी आक्रमक झाला आहे.
अमरावती येथील याच कृषी महोत्सवाला भेट देण्यासाठी काल राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार देखील आले होते. यावेळी माध्यमांशी बोलून झाल्यानंतर काही शेतकऱ्यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांना कांदा दराबद्दल प्रश्न विचारले. साहेब कांद्याच्या भावाचे काय झाले? रद्दी पेक्षा कमी भावात कांदा विकण्याची वेळ आहे. मागच्या वर्षी कपाशीला १४५०० भाव होता आता एवढा कमी का ? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती शेतकऱ्यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर केली. मी या सगळ्या प्रश्नांची उत्तरे भाषणातून देईल, असे कृषिमंत्र्यांनी सांगितलं. आम्ही शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी प्रत्येक निर्णय घेणार आहोत. नापिकी असेल किंवा पिकाला भाव देणे असेल यासाठी शिंदे फडणवीस सरकार सगळ्यात सक्षम सरकार आहेत, असं भाषणात त्यांनी सांगितलं.