मुंबई (प्रतिनिधी ) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच शिवसेनेचे खासदार निवडून आले शिवसेनेचे १८ पैकी १४ खासदार आमच्या संपर्कात आहेत. योग्यवेळी ते आम्ही जाहीर करू, असा गौप्यस्फोट करतानाच शिवसेनेचे 24-25 आमदार नाराज असल्याचा दावाही भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
लाड यांनी योग्य वेळी म्हणजे नेमके कधी जाहीर करणार हे स्पष्ट केलं नाही. मात्र, शिवसेनेचे नेमके कोणते आमदार भाजपच्या संपर्कात आहेत याबद्दल तर्कवितर्कही लढवले जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात म्हणाले की, तळमळतंय, जळमळतंय. मात्र, त्यांनाच आपल्या पक्षातील खासदारांची तळमळ, जळजळ दूर करता आली नाही. मात्र, त्याचं चूर्ण आमच्याकडे आहे आणि आम्ही ते योग्यवेळी देऊ, असं टोलाही लाड यांनी लगावला आहे.
शिवसेना नेत्यांना पालकमंत्री दाद देत नाहीत. हे आता उघड झालं आहे. त्यामुळे त्यांच्या मनातील मळमळ दिसून येत आहे, अशी टीका प्रसाद लाड यांनी केली. मशिदीवरील भोंग्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिकेचंही त्यांनी स्वागत केलं. राज ठाकरे यांच्या या भूमिकेचं मी स्वागत करतो. बाळासाहेब ठाकरे यांनी भोंगे आणि अजना संदर्भात जी भूमिका जाहीर केली होती. शिवसेनेची ती भूमिका आता बदलली आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खुद्द जाहीर करणार आहेत का?, असा सवाल प्रसाद लाड यांनी केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली. त्याचंही लाड यांनी स्वागत केलं. मनसेने हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. ही अत्यंत चांगली बाब आहे. हीच भूमिका पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे घेऊ शकतील का? असा सवालही त्यांनी केला.
महाराष्ट्र आता पश्चिम बंगालच्या दिशेने चालला आहे. त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. राज्याच्या यंत्रणा आणि केंद्राच्या यंत्रणा यांच्या कारवाईत फरक असतो. केंद्रीय यंत्रणा कोणतीही कारवाई करण्या आधी पाच ते सहा महिने काम करत असतात, असं त्यांनी सांगितलं.