मुंबई (वृत्तसंस्था) – यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणारा टी20 विश्वचषक आयसीसीने पुढे ढकलला आहे. म्हणून आयपीएल 2020 आयोजित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वृत्तानुसार, यावर्षी आयपीएल 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये खेळला जाईल. पूर्वी 8 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळला जाईल, असे सांगितले जात होते, पण आता ही तारीख बदलू शकते असे सांगण्यात येत आहे.
स्पर्धा सुरु होण्याच्या तारखेमध्ये कोणताही बदल झालेला नाही परंतु अंतिम सामना 8 ऐवजी 10 नोव्हेंबरला खेळला जाईल. असे झाल्यास स्पर्धा 51 ऐवजी 53 दिवस असेल. सध्या यावर चर्चा होत आहे आणि 2 ऑगस्ट रोजी होणार्या आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत अंतिम निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अंतिम सामन्यासाठी निश्चित केलेली तारीख 10 नोव्हेंबर, दिवाळी दरम्यान आहे. पूर्वीच्या तारखेवर प्रसारक फारसे खूष नव्हते आणि त्याबद्दल त्यांनी आपला विरोध नोंदवला होता. आयपीएलचे प्रसारक असलेल्या स्टारला दिवाळीचा आठवडा अधिकाधिक वापरायचा आहे. यंदा दिवाळी 14 नोव्हेंबरला आहे, अशा परिस्थितीत अंतिम सामना दिवाळीच्या आठवड्यात खेळला जावा अशी त्याची इच्छा आहे. जर तसे झाले तर रविवारी आयपीएलचा अंतिम सामना न खेळण्याची ही पहिली वेळ असेल.
आयपीएलचा अंतिम सामना झाल्यानंतर भारताला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय संघाचे सराव शिबिर आयोजित केले जाणार आहे. जे खेळाडू अंतिम सामन्यात खेळणार नाहीत ते खेळाडू या सराव शिबिरामध्ये दाखल होतील. आयपीएलचा अंतिम सामना झाल्यानंतर सर्व भारतीय खेळाडू हे कॅम्पमध्ये दाखल होतील आणि एकत्रितरित्या ऑस्ट्रेलियाकडे रवाना होतील.