अहमदनगर (वृत्तसंस्था) – अहमदनगर जिल्हा बँकेच्या राहुरी तालुक्यातील सोनगाव शाखेत सोनेतारण कर्ज प्रकरणी मोठा घोटाळा उघडकीस आला असून तब्बल अडीच कोटी रुपयांचे सोनेतारण ठेवलेले सोने बनावट निघाले आहे. नेमके यातील ठग कोण? याबाबत चौकशी सुरु झाली आहे. कर्जदार आणि बँकेचा सुवर्णपारखी यांनी संगनमताने ही फसवणूक केल्याचा बँकेचा संशय आहे. आता या प्रकरणाची चौकशी करुन गुन्हे दाखल करण्याची भुमिका बँकेने घेतली आहे.
जिल्हा सहकारी बँकेच्या सोनगाव शाखेतील सोनेतारण केलेल्या 191 पैकी तब्बल 134 कर्जदारांचे सुमारे अडीच कोटी रुपयांच्या कर्ज वसुलीचे सोन्याचे दागिने बनावट आढळल्यानंतर खळबळ उडाली. 57 कर्जदारांनी सोन्याचे दागिने सोडविल्याने बँकेची सुमारे 50 लाख रुपयांची वसुली झाली असली तरी बनावट सोने गहाण ठेवलेल्या 134 कर्जदार आणि सोनगाव शाखेचा सुवर्णपारखी (सराफ) यांच्यावर बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली. त्यातच कर्जदारांना धमकवून रक्कम भरण्याचा बँकेचा आडमुठेपणा, यामुळे दोष नसताना काही कर्जदारांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे.
गेल्या वर्षी बँकेचे व्यवस्थापक म्हणून प्रवीण पवार यांनी चार्ज घेतल्यानंतर सोनेतारण कर्जात अनियमितता आढळून आली. अनेकांना नोटीस पाठवून वसुली होत नसल्याने अखेर जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयातील सरव्यवस्थापक राजेंद्र शेळके यांच्या अधिपत्याखाली सोनगाव शाखेतील सोनेतारण दागिन्यांची सत्यता पडताळणी नुकतीच पूर्ण झाली.
राहुरी येथे जिल्हा बँकेच्या तालुका विकास अधिकारी कार्यालयात बँकेचे अधिकारी, सहकार खात्याचे प्रतिनिधी, पोलीस, कर्जदार यांच्यासमक्ष गहाण दागिन्यांची पिशवी उघडून बँकेने नियुक्त केलेल्या सुवर्णपारखी (सराफ) यांनी 191 कर्जदारांच्या दागिन्यांची सत्यता पडताळणी केली यातील 57 जणांनी कर्ज आणि व्याजाची रक्कम भरुन दागिने सोडवून घेतले. त्यांच्या दागिन्यांची सत्यता पडताळणी करण्यात आली नाही. मात्र, आम्ही खर सोन ठेवले असल्याचा दावा आता अनेक कर्जदारांनी केला. आम्ही दोषी असलो तर कारवाई करा मात्र प्रकरणाची सखोल चौकशी करा, अशी भूमिका कर्जदारांनी घेतली.
सोनगाव शाखेतील सोनेतारण कर्जाच्या प्रकरणी बनावट सोने आढळलेले 134 कर्जदार आणि सोनगाव शाखेतील सुवर्णपारखी यांच्यावर बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी चौकशी सुरु केल्याची माहिती शाखेचे व्यवस्थापक प्रवीण पवार यांनी दिली.
या सर्व प्रकारात नेमकं कर्जदारांनी बँकेला फसवले, की मुख्य सुवर्णपारखी असलेल्या सोनाराने काही कर्जदारांशी संगनमत करुन बँकेची फसवणूक केली? की यामागे संपूर्ण टोळी कार्यरत आहे, तसेच या सर्व प्रकारणात बँकेतील कोणाची साथ आहे का?, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. तरी चौकशीनंतर यातील सत्यता बाहेर येईल.