मुंबई (वृत्तसंस्था) – देशातील चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला. यात पश्चिम बंगालच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपचं आव्हान फोडून काढत घवघवीत यश प्राप्त केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जींचेच सरकार येणार असल्याचं निश्चित झालं आहे. पश्चिम बंगालमधील भाजपच्या पराभवावर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीही निशाणा साधला आहे. नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मलिक यांच्यावर निशाणा साधला.

“पश्चिम बंगालमधील मतदारांनी नाकारल्यामुळे गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, असं नवाब मलिक म्हणाले. अहो, नवाब मलिक अजित दादांचा राजीनामा मागायचाय तर सरळसरळ मागा. हे द्राविडी प्राणायम कशाला?,” असं म्हणत भातखळकर यांनी नवाब मलिकांना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला.
पंढरपूर पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदरवाराला पराभवाला सामोरे जावे लागले होते. या ठिकाणी अनेक दिग्गजांनी सभाही घेतल्या होत्या. “पंढरपूरमधील महाभकास आघाडीचा पराभव म्हणजे ठाकरे सरकारला लोकांनी नाकारले असे मी म्हणणार नाही. यांना स्वीकारले कोणी होते? हे जबरदस्तीने जनतेच्या डोक्यावर बसले. समाधान आवताडे यांचा विजय हा देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या अचूक रणनीतीचा परिणाम आहे,” असंही ते म्हणाले.







