एरंडोल (प्रतिनिधी) – तालुक्यातील रवंजे खुर्द येथील युवक जितेंद्र गजमल पाटील (वय- ३७) याचा शनिवारी १२ मे रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास विहिरीत पाय घसरून पडुन मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.
रवंजे खुर्द येथील जितेंद्र गजमल पाटील हा युवक सकाळी आपल्या शेतामध्ये कामाला गेला होता. तो शेतातील विहिरीतील पाणी काढत असतांना अचानक त्याचा तोल गेला व तो विहिरीत पडला. त्यास शेतातील मजुरांच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले व एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. याठिकाणी डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. जितेंद्र हा घरातील मोठा मुलगा होता.त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, लहान भाऊ व बहीण असा परिवार आहे. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला देविदास बापू पाटील यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली जुबेर खाटीक हे करीत आहे.