मुंबई (वृत्तसंस्था) – काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी अचानकपणे भेट घेतली. पवार-फडणवीस भेटीमुळे राजकीय तर्क-वितर्कना उधाण आले होते. त्यातच फडणवीसांनी नंतर जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांचीही भेट घेतल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवार-फडणवीस भेटीबाबत खुलासा केला आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठींमधून भाजपचा संघर्ष संपणार आहे असा प्रश्न पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, भाजपचा संघर्ष कधीच संपणार नाही. भेटीगाठी अनेक कारणांनी सुरु आहेत. शरद पवार आजारी आहेत, त्याबद्दल चौकशी करण्यासाठी फडणवीस गेले होते, असं पाटील म्हणाले.
दरम्यान, भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून शरद पवार यांच्यावर टीका केल्यासंदर्भातही पाटील यांना प्रश्न विचारला असता पाटील म्हणाले की पडळकरांच म्हणन बरोबरच आहे. शरद पवार हे सगळ्याचे गॉडफादर आहेत. ठाकरे सरकारचे ते मार्गदर्शक आहेत.स्वतःच्या पक्षावर आणि महाविकास आघाडीवर त्यांचा कंट्रोल आहे, मग तरी आरक्षण का मिळाले नाही? म्हणून त्यांच्याकडे दोष जातो.