भुसावळ (प्रतिनिधी) – रब्बी हंगाम सुरू असून शेतीसाठी होणारे भारनियमन रद्द करण्यासाठी भुसावळ तालुक्यातील पिंप्रीसेकम येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. भारनियमन सुरू असल्याने शेतकऱ्यांना मोठया नुकसानीला तोंड द्यावे लागत असून तात्काळ भारनियमन रद्द करण्याची मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे. आंदोलनस्थळी आ. सत्यजीत तांबे यांनी आंदोलकांची भेट घेत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या आहेत.
पिंप्रीसेकम संघर्ष समितीच्या वतीने आ. सत्यजीत तांबे यांना एक निवेदन देण्यात आले आहे. पिंप्रीसेकम गाव पूरग्रस्ताच्या यादीत येत असून गावाला भविष्यात गावठाण विस्ताराकरीता गट नं. २०५ हि मिळकत गावठाणाकडे वर्ग करण्याचे आदेश जळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडून निर्गमित करण्यात आले आहेत. ते अद्याप प्रलंबित आहे. तसेच दिपनगर महानिर्मिती प्रशासन यांनी पिंप्रीसेकम गाव दत्तक गाव म्हणून जाहीर करावे व मुलभूत सोयी- सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. सोबतच गावातील विद्यार्थ्यांना स्कूल बसची व्यवस्था करून देण्यात यावी व प्रकल्पग्रस्तांना त्वरीत रोजगार मिळावा अश्या अनेक मागण्या यात करण्यात आल्या आहेत.
महानिर्मिती व महावितरण अधिकाऱ्यांशी चर्चा करून सदर भारनियमन तत्काळ रद्द होण्यासाठी प्रयत्न करणार व आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शासन स्तरावर योग्य तो पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन आमदार सत्यजीत तांबे यांनी सदर आंदोलनकर्त्यांना दिले आहे.