जळगाव ( प्रतिनिधी ) – राज्य निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील 62 तालुक्यातील 271 ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर केली आहे. 5 जुलै रोजी आचारसंहिता लागू होणार आहे. 4 ऑगस्टरोजी मतदान, तर 5 ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. 271 ग्रामपंचायतीमध्ये जळगाव जिल्ह्यातील 24 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या 17 मेरोजीच्या आदेशानुसार पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेले 62 तालुके निवडून तेथील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
संबंधित तहसीलदार 5 जुलैरोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्रे 12 ते 19 जुलै या कालावधीत दाखल करण्यात येतील. शासकीय सुट्टीमुळे 16 आणि 17 जुलै रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 20 जुलैरोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 22 जुलैरोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. मतदान 4 ऑगस्टरोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 5 ऑगस्ट रोजी होईल.. त्यात जळगाव जिल्ह्यातील 24 ग्रामपंचायतींचा समावेश.असून रावेर तालुक्यातील १२, अमळनेर १, एरंडोल २, पारोळा ३ तर चाळीसगाव तालुक्यातील ६ ग्रामपंचातींचा समावेश आहे.








