मुंबई (वृत्तसंस्था) – ठाणे आणि मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील प्रलंबित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्राला मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी त्वरीत निविदा प्रक्रिया करून काम चालू करण्याचे आदेश सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.

ठाणे महानगरपालिका हद्दीतील आनंद नगर येथील महानगरपालिकेच्या सुविधा भुखंडावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी जवळपास 9 कोटी 75 लाख रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी 90 टक्के राज्य शासनाचा निधी उपलब्ध होणार आहे. यासाठी ठाणे महानगरपालिकेकडून 10 टक्के निधी दिला जाणार आहे.
ही संपूर्ण वास्तू पूर्ण झाल्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या ताब्यात राहणार आहे. त्याची निगा आणि देखभाल ठाणे महानगरपालिका करणार आहे. या केंद्रासाठी ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी ही दिलेली आहे.
अशाच पध्दतीने मिरा-भाइर्दर महानगरपालिका क्षेत्रातील महसूल खात्याची जमीन सामाजिक न्याय विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे. त्याठिकाणी 13 कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी 90 टक्के राज्य शासन आणि 10 टक्के खर्च हा मिरा-भाइर्दर महानगरपालिका करणार आहे. त्यांचीही निगा आणि देखभाल सदरची वास्तू पुर्ण झाल्यानंतर मिरा-भाइर्दर महानगरपालिकेकडे सोपविण्याचा शासनाचा निर्णय झालेला आहे. तसेच मिरा-भाइर्दर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने ही मंजुरी ही दिलेली आहे.
दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असलेल्या ठाणे आणि मिरा-भाइर्दर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आंबेडकर अनुयायांची संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरामध्ये या केंद्राची निर्मिती व्हावी अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे होत होती. तसेच या वास्तूमध्ये विपश्यना केंद्र, लायब्ररी आणि राहण्याची व्यवस्था होत आहे. त्यामुळे परगावाहून येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांना त्याचा फायदा होणार आहे. या दोन्हीं प्रस्तावाना मंजुरी देत असताना गरज पडल्यास या केंद्रांसाठी शासन निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही सामाजिक न्यायमंत्र्यांनी दिली.
त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्राला राज्य शासनाच्या वतीने मंजुरी देण्यात आली आहे. त्यानंतर आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांचे आभार मानले.







