इम्फाळ (वृत्तसंस्था) – देशभरातील राजेशाही आणि विविध राजांच्या जुलमी प्रथांचा अंत झालेला असतानाही, आजही स्वातंत्र्याच्या 72 वर्षांनंतर पूर्वेकडील राज्यांमध्ये गुलामी मानसिकतेचा प्रत्यय देणाऱ्या रुढी परंपरा सुरु असल्याचे पाहून, तुमची तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. यावेळी अशा निंद्य घटनेला भारतीय जनता पक्षाचे नेते असलेले मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग हे वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत.
मणिपूरची राजधानी असलेल्या इम्फाळमध्ये मादक द्रव्यविरोधी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व जाती-धर्माच्या प्रतिनिधींनी अफू-चरस आणि गांजाच्या लागवडीला विरोध करण्याची शपथ घेतली. स्वत: मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. मात्र, यावेळी मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी शालेय विद्यार्थ्यांना आणण्यात आले होते. या विद्यार्थ्यांना गुडघे टेकून डोके जमिनीला लावत मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्याची सक्ती करण्यात आली. संतापजनक बाब म्हणजे, स्वत: मुख्यमंत्र्यांनी या स्वागताचा फोटो ट्वीट करुन, महनीय व्यक्तींच्या स्वागतावेळी या शालेय विद्यार्थ्यांनी आपली परंपरा जतन केल्याबद्दल मोठे कौतुक केले.