सांगली (वृत्तसंस्था) – दिल्ली येथील ट्रॅक्टर रॅलीदरम्यान 26 जानेवारी रोजी हिंसाचार उसळल्यानंतर शेतकऱ्यांच्या या मोर्चावर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. याच हिसांचारावर बोलताना माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांनी आंदोलकांवर टीकास्त्र डागलंय. दिल्लीतील हिंसाचारात सामील असणारे शेतकरी नाहीत. ते दर देशद्रोही आहेत, असा हल्लाबोल खोत यांनी केलाय.


दिल्लीमध्ये ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचारानंतर देशभरातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी हे आंदोलन शेतकऱ्यांचे नसल्याचे म्हणत झालेल्या हिंसाचाराचा तीव्र निषेध केला. तर आंदोलक समर्थकांनी आंदोलन चिघळण्यामागे शेतकरी नसून बाहेरच्या शक्तींचा यामागे हात असल्याचा दावा केला. या आंदोलनाबद्दल बोलताना माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांनीसुद्धा शेतकऱ्यांच्या या रॅलीवर टीका करत दिलीमध्ये हिंसा करणारे शेतकरी नसून ते तर देशद्रोही आहेत, अशी टीका केली.
प्रजासत्ताकदिनी (26 जानेवारी) दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. केंद्र सरकारने लागू केलेले कृषी कायदे रद्द करावेत. किमान आधारभूत मूल्याला कायद्याचे अधिष्ठान द्यावे, अशा प्रमुख मागण्या या आंदोलकांनी केल्या होत्या. मात्र, आयोजित रॅलीला हिंसक वळण मिळाले आणि दिल्लीतील हिंसाचारात शेतकऱ्यांसह अनेक आंदोलक जखमी झाले. हिंसाचाराला व्यापक रुप मिळाल्यानंतर आंदोलकांनी दिल्लीतील लाल किल्ल्यामध्ये प्रवेश करत विरोध प्रदर्शन केले. यावेळी लाला किल्ल्यावरसुद्धा आंदोलक आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता.
यावेळी बोलताना सदाभआऊ खोत यांनी राज्य सरकारवर टीका केली. करोनाच्या काळात राज्य सरकरने कोणतीही मदत केली नाही, जी मदत झाली ती फक्त केंद्र सरकारने दिली आहे, असे सदाभाऊ खोत म्हणाले. तसेच, राज्य सरकारने कामगारांचे प्रश्न सोडवावेत. अन्यथा कामगारांवर अन्याय करणाऱ्यांचे आम्ही हात कलम करु, असे वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केले. महाविकास आघाडीचं सरकार हे आंधळं आणि बहिरं असल्याचंही सदाभाऊ खोत म्हणाले.







