मुंबई (वृत्तसंस्था) – आयपीएस रश्मी शुक्ला यांनी ज्या काळात फोन टॅपिंग केले त्या काळात भारतीय पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्याच झाल्या नसल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी अहवालात नमूद केले आहे. या बरोबरच वर्ष २०२० मध्ये काही अपवाद वगळता सर्व बदल्या या पोलिस अस्थापना मंडळ-१ च्या शिफारशीच्या आधारे शासनाने केल्या असल्याचे अहवालात म्हटले आहे. पोलिस आस्थापना मंडळाच्या सर्व शिफारसी सर्व सदस्यांच्या एकमताने करण्यात आल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.


विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएस रश्मी शुक्ला यांच्या अहवालाचा संदर्भ देऊन पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमधील गैरव्यवहार झाल्याचे गंभीर आरोप केले होते. आपल्याकडे याबाबतच्या संवादाचा ६.३ जीबीचा पेन ड्राईव्ह असल्याचा दावा देखील फडणवीस यांना नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत केला होता. मात्र वस्तुस्थिती तशी नसल्याचे या अहवालात म्हटले आहे.
यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘राज्याचे मुख्य सचिव श्री सीताराम कुंटे यांनी फोन टॅपिंग बद्दल जो अहवाल सरकारकडे सुपूर्द केला त्यामध्ये कुठेही पेन ड्राईव्ह दिल्याचा उल्लेख नाही. मग देवेंद्रजीनी पत्रकार परिषदेमध्ये जो पेन ड्राईव्ह दाखवला तो संवादाचा की गाण्याचा हे जनतेला एकदा स्पष्ट सांगावे’. असा घणाघात मिटकरी यांनी केला आहे.







