“मनाच्या नजरेतून”, “गझलयात्री भाग २” पुस्तकांचे प्रकाशन
जळगाव (प्रतिनिधी) – गझल पर्शियन मधून आली. ती आज देशभरातल्या विविध भाषेत लिहिली जाते. गझल सम्राट सुरेश भट यांचे गझल विकासात मोठे योगदान आहे. पूर्ण मराठीकरण असलेल्या गझल सुरेश भट यांनी केल्या आहेत. आपल्याला जे अभिव्यक्त व्हायचे आहे, ते आतून स्फुरले पाहिजे. मात्रा नुसार शब्द लिहिता आले पाहिजे. त्यानुसार ओळ बनवता आली पाहिजे. मग गझल बनायचा प्रवास सुरू होतो. गझलेत 2 ओळीत कवितेचा सार सांगितले जाते, असे मार्गदर्शन शहरात रविवारी २६ रोजी गझल लेखन कार्यशाळेत मान्यवरांनी केले.
व. वा. वाचनालयाच्या सभागृहात गझल मंथन साहित्य संस्थेतर्फे मराठी गझल लेखन कार्यशाळा आणि मराठी गझल मुशायऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. गझल मंथन साहित्य संस्थेने पहिल्या सत्रात आयोजित केलेल्या निःशुल्क गझल लेखन कार्यशाळेत ४० पेक्षा अधिक नवोदितांनी गझलेचे धडे घेतले. तसेच दोन लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशनदेखील झाले. यासोबतच दुसऱ्या सत्रात महाराष्ट्रातील नामांकित गझलकारांचा बहारदार मुशायरा देखील रंगला.
सकाळी सांगली येथील जिल्हा न्यायाधीश पुरुषोत्तम जाधव, गझलकार डॉ.ज्ञानेश पाटील, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अँड. केतन ढाके या मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
पहिल्या सत्रात सुप्रसिद्ध गझलकार डॉ. कैलास गायकवाड, डॉ.ज्ञानेश पाटील आणि निलेश कवडे यांनी प्रशिक्षणार्थींना गझल लेखनाचे धडे दिले. गझलचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे असतं, की गझलचा प्रत्येक शेर ही एक स्वतंत्र कविता असते.गझलचे शेर हे संवादात्मक, वाचकाशी-श्रोत्याशी समोरासमोर बसून गप्पा मारल्यासारखे सहजसोप्या भाषेत असावेत असा संकेत आहे, असे त्यांनी सांगितले.
कविवर्य सुरेश भटांनी गझल या काव्यप्रकाराला तंत्रशुद्ध अशी बाराखडीची जोड देऊन स्वत: अनेक उत्तमोत्तम गझलरचना तर केल्याच, पण इतर समकालीन कवींनाही गझल लेखनाबद्दल मार्गदर्शन केले. त्यांची गझलेची बाराखडी ही अजूनही समस्त नव्या व जुन्या गझलकारांसाठी एखाद्या दीपस्तंभासारखे कार्य करीत आहे असेही त्यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन गझलकार यशवंत मस्के यांनी केले.
पुस्तकांचे प्रकाशन
कार्यशाळेनंतर अँड. मुकुंदराव जाधव लिखित “मनाच्या नजरेतून’ या काव्यसंग्रहाचे आणि जयवंत वानखडे संपादित ‘गझलयात्री भाग २’ या गझल संग्रहाचे प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश पाटील आणि स्वागताध्यक्ष सांगली येथील जिल्हा न्यायाधीश पुरुषोत्तम जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ऍड. केतन ढाके, गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे उपस्थित होते.
गझल हा एक सर्वांगसुंदर असा काव्यप्रकार आहे. मराठीतही आता हा प्रकार लोकप्रिय होतोय. अरबी, पारशी, उर्दू, हिंदी आणि मराठी असा जरी मराठी गझलचा प्रवास झाला असला तरी अस्सल मराठमोळेपणा मराठी गझलेने जपला आहे, असे प्रतिपादन न्या. जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.ज्ञानेश पाटील यांनी, मराठी गझलांना समृद्ध परंपरा असल्याचे सांगितले.
कार्यक्रमासाठी जळगाव जिल्हा वकील संघाचे सहकार्य लाभले. गझल मंथन साहित्य संस्थेचे खान्देश उपविभाग सचिव अँड.मुकुंदराव जाधव, जिल्हाध्यक्ष डॉ.शकुंतला चव्हाण, उपाध्यक्ष छाया बैसाणे, सदस्य शिवाजी साळुंखे, भरत माळी आदींनी परिश्रम घेतले.
उत्कृष्ट रचनांच्या मांडणीतून रंगला गझल मुशायरा
दुपारच्या सत्रात गझल मुशायरा रंगला. त्यात डॉ. कैलास गायकवाड (नवी मुंबई), निलेश कवडे, डॉ. ज्ञानेश पाटील, अमोल शिरसाट, हेमलता पाटील, जयवंत वानखेडे, वासुदेव गुमटकर, शिवाजी साळुंखे, अनिता खैरनार, दिगंबर खडसे यांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन यशवंत मस्के यांनी केले. अनिता खैरनार यांनी “होती दिली मी आठवण राजसा, बंदिस्त केली मी भावना” ही तर निलेश कवडे यांनी “जायाचे पुढे आहे, आपल्यातला कोणीतरी पाय ओढतो आहे” ही गझल सादर केली. जयवंतराव वानखेडे यांनी, “मला पाहून झुकणाऱ्या तुझ्या नयनात आहे मी, तुला दिनरात पडणाऱ्या खुळ्या स्वप्नात आहे मी” या मुशायऱ्याने वाहवा मिळविली.
वासुदेव गुमटकर यांनी, ‘शब्द भोळे बोलणारे पाहिले मी” ही गझल तर शिवाजी साळुंखे यांनी, ‘कसे पांग फेडू तुझ्या आसवांचे, जगवते मला जग तुझ्या आठवांचे” हा मुशायरा मांडला. यासह डॉ.कैलास गायकवाड, दिगंबर खडसे, उर्मिला बांदिवडेकर, हेमलता पाटील, निलेश कवडे, यशवंत म्हस्के, यांनीही मुशायरा व रचना सादर केल्या.